
>> गणेश पुराणिक | मुंबई
संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये 19 सप्टेंबर पासून आयपीएलचा 13 वा हंगाम सुरू होणार असून अंतिम सामना 10 नोव्हेंबरला रंगणार आहे. यावेळेस सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघावर असणार आहे. मागील आयपीएलपेक्षा यंदा आरसीबीचा संघ संतुलित वाटत आहे. त्यामुळे विराट कोहलीचा संघच यंदा आयपीएल जिंकण्याचा दावेदार मानला जात आहे. मात्र आजपर्यंत विजेतेपदाला मुकलेल्या आरसीबी संघासाठी हे चॅलेंज ‘विराट’ असणार आहे.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मात्र दोन वेळा फायनल गाठणाऱ्या संघाला तो अद्याप चॅम्पियन बनवू शकलेला नाही. 2009 ला डेक्कन चार्जर्सने बंगळुरूच्या स्वप्नांना सुरुंग लावला. तर 2016 ला पुन्हा एकदा विराटच्या संघाने आयपीएलची फायनल गाठली, मात्र इथे सनरायझर्स हैद्राबादने त्यांचा पराभव केला. यंदा आरसीबीचा पहिला सामना 21 सप्टेंबरला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध आहे.
IPL 2020 – मुंबई इंडियन्सपुढे जेतेपद राखण्याचे आव्हान, ‘ही’ आहे मुख्य अडचण
सर्वाधिक धावा आणि सर्वात कमी धावांचा विक्रम
आरसीबीची जमेची बाजू म्हणजे स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम विराटच्या संघाच्या नावावर आहे. 2013 साली झालेल्या आयपीएल हंगामात आरसीबीने पुणे वारिअर्स विरुद्ध 20 षटकात 5 विकेट्स गमावून 263 धावा चोपल्या होत्या. मात्र सर्वाधिक स्कोरचा विक्रम असलेल्या याच संघाच्या नावावर स्पर्धेतील सर्वात कमी धावांवर बाद होण्याचा विक्रमही आहे. केकेआरविरुद्ध आरसीबीने अवघ्या 49 धावात लोटांगण घातले होते.
‘या’ खेळाडूंवर असणार नजर
आरसीबीकडे जगातील सर्वोत्तम खेळाडू ‘रनमशीन’ विराट कोहली आणि ‘360 मॅन’ एबी डिव्हीलिअर्स आहे. तसेच यंदा या संघाने क्रिस मॉरिस, एरॉन फिंच आणि ऍडम झम्पा यांनाही संघात घेतले आहे. तसेच चतुर फिरकीपटू युझवेंद्र चहल देखील संघात आहे. तर उमेश यादव, मोहम्मद सिराज, डेल स्टेन आणि नवदीप सैनी असा वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे.
संपूर्ण संघ
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हीलिअर्स, मोइन अली, युझवेंद्र चहल, पार्थिव पटेल, मोहम्मद सिराज, उमेश यादव, पवन नेगी, देवदत्त पडिकल, गुरकीरत सिंह मान, वाशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, नवदीप सैनी, एरॉन फिंच, क्रिस मॉरिस, शाहबाज अहमद, पवन देशपांडे, जोशुआ फिलिप, इशरू उडाना, डेल स्टेन, ऍडम झम्पा.
IPL 2020 – राजस्थानचे ‘रॉयल’ दिवस पुन्हा येतील का? दिग्गज खेळाडूंच्या सहभागावर सवाल