Weather Update – राज्याला पुन्हा अस्मानी संकटाचा तडाखा बसणार; हवामान खात्याचा अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात वाढत्या उष्णतेमुळे लाहीलाही होत असताना अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूर, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाची असाधारण स्थिती दिसून येण्याची शक्यता आहे. लातूर, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसासोबतच, 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान, विदर्भामध्ये तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसवर पोहचला असून उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उष्ण आणि दमट हवामानामिळे नागरिक हैराण झाले आहेत. तर मुंबई आणि कोकण पट्ट्यात कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असले, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 65 % ते 80% दरम्यान असल्याने उकाडा जाणवत होता.

मुंबई आणि किनारपट्टीवरील कोकण भागात तुलनेने कमी तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथील वेधशाळेने कमाल 33.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली, तर सांताक्रूझ येथे तापमान 33.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अलिबाग, रत्नागिरी आणि डहाणू आदी किनारपट्टीच्या भागात तापमान 31.5 अंश सेल्सिअस ते 33.1 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले.