आंबा घाटातील एसटी वाहतूकही बंद, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंबाघाट मार्गावरील काही भाग खचल्यामुळे सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. एसटी वाहतूकही बंद करण्यात आली असून कोल्हापूर मार्गे जाणाऱ्या सर्व बस पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. वाहतुकीला धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी पुढील आदेश येईपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आंबाघाट मार्गे रत्नागिरीहून कोल्हापूर तसेच कोल्हापूरहून रत्नागिरीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. आता रत्नागिरी–कोल्हापूर मार्गावरील एसटी बस लांजा, वाटूळ, ओणी, पाचल, अनुस्कूरा, मलकापूर मार्गे कोल्हापूर अशी धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आंबाघाट मार्ग बंद असल्याची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.