
मुसळधार पावसामुळे दोन दिवस बंद असलेला जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग अंशतः पुन्हा सुरू करण्यात आला आहे, त्यानंतर रविवारी सकाळी भगवती नगर बेस कॅम्पवरून 3 हजार 886 यात्रेकरूंची नवीन तुकडी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका दिवसाच्या विश्रांतीनंतर, 25 वी तुकडी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत 177 वाहनांच्या ताफ्यासह पहाटे 2:52 वाजता जम्मू बेस कॅम्पवरून मध्य काश्मीरमधील गांदरबल येथील बाल्टालसाठी रवाना झाली. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू झाली. आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेला भेट दिली आहे. 57 दिवसांची ही यात्रा 28 ऑगस्टला संपणार आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुसळधार पावसामुळे उधमपूरमधील झाकानी आणि रामबनमधील बनिहाल दरम्यान जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाचे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले असून, त्यासाठी मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. शनिवारी जम्मूहून येणारी वाहतूक एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली होती. उधमपूरच्या समरोली भागातील देवल पुलाजवळ एकेरी वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे, ज्यामुळे यात्रेकरूंच्या ताफ्याला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुरुस्तीचे काम अजूनही सुरू असले तरी, दोन दिवसांच्या बंदीनंतर रविवारी सकाळी जम्मूहून हलक्या वाहनांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. त्यांनी असेही सांगितले की, अमरनाथ यात्रेकरूंचा ताफा या भागातून गेल्यानंतर पुढील काही तासांत काझीगुंडहून जम्मूच्या दिशेने वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल.
वाहतूक पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, अवजड वाहनांना एका दिवसाआड महामार्गावरून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. पुढील काही दिवसांत हवामान खराब राहण्याचा अंदाज असल्याने, वाहतूक पोलिसांनी प्रवाशांना महामार्गावरून प्रवास करण्यापूर्वी रस्त्यांची आणि वाहतुकीची सध्याची परिस्थिती काय आहे हे पाहूनच प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.
























































