गर्दी नको, बेफिकिरी नको, आरोग्यदायी समृद्ध महाराष्ट्र घडवूया! मुख्यमंत्र्यांकडून नववर्षाच्या भरभरून शुभेच्छा

नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्गवाढीला हातभार लागणार नाही याची खबरदारी घ्या, असा सावधगिरीचा इशारा देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकजुटीने आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र घडवूया. नववर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशा शब्दांत राज्यातील जनतेला नववर्षानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात कितीही संकटे येवोत थांबायचे नाही, पण सतर्क आणि सावध राहायला हवे. आव्हाने येऊ देत. त्यावर आपण मात करूया असा विश्वास राज्यातील जनतेला दिला. मुख्यमंत्री आपल्या संदेशात पुढे म्हणतात, नवे वर्ष हे आपल्याला नवनवीन संकल्पांसाठी प्रेरणा देते. अनेकजण अडथळ्यांना दूर सारून नवे संकल्प करतात, नव्या उमेदीने उभे राहतात. याच उभारीतून एक-एकजण म्हणता म्हणता आपला समाज आणि आपण आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज होतो. हीच जिद्द बाळगून आपल्याला पुढे जायचे आहे. नवनवीन संकल्पांसाठी सिद्ध व्हायचे आहे. कितीही आव्हानं येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र आणि पर्यायाने बलशाली हिंदुस्थान घडवायचा आहे. त्यासाठी आणि नवीन वर्ष आरोग्यदायी ठरेल, ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन येईल याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन.