बच्चू कडूंचे बंडाचे निशाण

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून ‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. ‘वेळ आलीच तर महायुतीतून बाहेर पडून आम्ही लोकसभेसाठी उमेदवार देऊ,’ असा इशारा भाजपच्या नेत्यांना दिला आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे, पण बच्चू कडू यांनी या जागेवर दावा केला आहे. या ठिकाणी आमचे दोन आमदार आहेत. किमान एक लाख आमची मते आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थिती नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.