भाजप चोर आणि लफंग्यांचा पक्ष तर मोदी चोरांचे सरदार! संजय राऊत यांची घणाघाती टीका

जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला जातो, पण असे काहीच नाही. भाजपच्या लोकांनी येथील जनतेला फसवून विजय मिळवला आहे. भाजप हा पक्ष चोर आणि लफंग्यांचा पक्ष आहे तर मोदी चोरांचे सरदार आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केली.

महाविकास आघाडीच्या वतीने जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार आणि रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शिवसेना नेते संजय राऊत हे जळगावमध्ये आले होते. त्यानंतर संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले, जळगाव आणि रावेरमध्ये भाजपला गाडण्याची हिंमत इकडच्या जनतेमध्ये आहे. मला खात्री आहे की, महाराष्ट्रावर भाजपने जो अन्याय केला आहे, अत्याचार केला आहे त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार शिरीष चौधरी आदी उपस्थित होते.

घोटाळे लपवण्यासाठी अजित पवार भाजपबरोबर!

अजित पवार यांनी शिखर बँक घोटाळय़ासाठीच भाजपसोबत पलायन केले आहे. भाजपचे वॉशिंग मशीन त्यासाठीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ावर भाष्य केले. ते शिखर बँकेच्या घोटाळय़ावरही बोलले. पण आता भाजप सरकारने याच घोटाळय़ांप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट देत असेल तर या देशाचे पंतप्रधान किती खोटे बोलतात हे स्पष्ट होते, असे राऊत म्हणाले.

 

गद्दारांना जळगाव, रावेरमधून तडीपार करा!

मोदी म्हणतात आम्ही 400 जागा जिंकणार आहोत. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले 400 पार नाही तर या वेळेला तडीपार. जळगाव व रावेरच्या जनतेने आता इकडच्या गद्दारांना तडीपार केले पाहिजे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ती तुमच्या आमच्या सामान्य माणसांसाठी. हा महाराष्ट्र टिकला पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, ती आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना आपली मुंबई गुजरातला पळवायची आहे, असे राऊत म्हणाले.