रसगुल्ला खायला घालत अखेरची इच्छा पूर्ण केली, 8वीतल्या विद्यार्थ्यांच्या कृत्याने बंगाल हादरले

बंगालमधील नाडिया जिल्ह्यात 8वीत शिकणाऱ्या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. धक्कादायक बाब ही आहे की त्याच्यात वर्गातील मुलांनी त्याचा हा खून केला आहे. या मुलांनी वर्गमित्राचे अपहरण करून मुलाच्या घरच्यांकडे 3 लाखांची खंडणी मागितली होती. ती पूर्ण न केल्याने या मित्रांनी मुलाचा खून केला. खून करण्यापूर्वी या मुलांनी त्यांच्या मित्राला शेवटची इच्छा काय आहे असं विचारलं होतं. यावर या मुलाने मला रसगुल्ला खायचाय आणि कोल्डड्रींक प्यायचं आहे असं सांगितलं होतं. या मुलाची अखेरची इच्छा पूर्ण केल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला मारून टाकलं.

ज्या मुलाच्या खून झाला, त्या मुलाच्या घरच्यांना खंडणीसाठी फोन आला होता. धमकी देणाऱ्याने 3 लाखांची खंडणी मागितली होती. हा मुलगा शुक्रवारपासून बेपत्ता झाल्याने त्यांनी कृष्णनगर पोलिसांत तक्रार नोंदवली होती. या मुलाच्या घरच्यांनी सांगितले की हा मुलगा मित्रांना भेटायला जातोय असं सांगून सायकलवरून गेला होता. त्यानंतर तो घरी आलाच नाही. पोलिसांनी या मुलाच्या शोधासाठी मोहीम सुरू केली होती. दरम्यानच्या काळात बेपत्ता मुलाच्या घरच्यांना खंडणीसाठी फोन आला होता. पोलिसांनी सदर घटनेप्रकरणी 3 शाळकरी मुलांना ताब्यात घेतलं होतं. त्यांची चौकशी केली असता या मुलांनी अपहरण केलेल्या मुलाचा आपण खून केल्याचं कबूल केलं.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलांना गेमिंग लॅपटॉप हवा होता. तो विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी आपल्या मित्राच्या अपहरणाचा कट रचला होता. धमकी देऊनही अपहरण झालेल्या मुलाच्या घरचे पैसे देत नसल्याने या मित्रांनी मुलाचा खून करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी या मुलाचा गळा आवळला आणि त्याला ठार मारलं. ठार मारण्यापूर्वी या मुलांनी आपल्या मित्राची रसगुल्ला आणि कोल्डड्रींकची इच्छा पूर्ण केली होती.