निवडणूक आचारसंहितेपूर्वी थाटात लोकार्पण केलेल्या नगर-सोलापूर महामार्गासह बाह्यवळण रस्ता अपूर्णच

नगर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काही दिवस अगोदर मोठय़ा थाटात लोकार्पण झालेल्या नगर-सोलापूर महामार्गासह बाह्यवळण रस्त्याचे काम अजूनही अपूर्णच असून, महामार्गावरील अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्त्यांना अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसत आहे. सर्व्हिस रस्त्याअभावी महामार्गालगत असणाऱया गावातील नागरिकांची तसेच शाळकरी मुलांची हेळसांड होत आहे. महामार्गांवर उड्डाणपूल असणाऱया बऱयाच गावांतील सर्व्हिस रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. महामार्गावरील साकतखुर्द, शिराढोण या ठिकाणी अजूनही एका बाजूचे सर्व्हिस रोड पूर्ण झालेले नाही.

सर्व्हिस रस्ता नसल्याने महामंडळाच्या एसटी बस उड्डाणपुलावरून जात आहेत. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी मुलांना खांद्यावर दप्तराचे ओझे घेऊन अर्धा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. तसेच नगर येथे दैनंदिन कामासाठी जाणारे चाकरमानी, वृद्ध नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी यांनासुद्धा एक किलोमीटरची पायपीट करत थेट दहिगाव येथे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी सूचनाफलक, दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. बाह्यवळण रस्ता उंच बनवण्यात आल्याने निंबळक, नेप्ती, अरणगाव आदी गावांतील शेतकऱयांना शेतात जाण्यासाठी अडथळे येत आहेत.

याशिवाय वाळुंज तसेच नारायणडोह येथील रेल्वे काम अजूनही अपूर्णच आहे. एमआयआरसी येथील भुयारी मार्गाचे काम सध्या चालू आहे, तर दहिगाव येथील भुयारी मार्गाचे कामही पूर्ण झालेले नाही. महामार्गाची कामे अपूर्ण असताना घाईघाईत लोकार्पण सोहळा साजरा केल्याने नगर-सोलापूर महामार्गाबद्दल ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ अशीच अवस्था आहे. दरम्यान, नगर येथील बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच थाटात पार पडला. बाह्यवळण रस्त्यासह महामार्गाचे काम अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रस्ता उद्घाटनाचा फार्स झाल्याची चर्चा होत आहे.

गाव एकीकडे अन् बसथांबा भलतीकडे

– नुकतेच लोकार्पण झालेल्या सोलापूर महामार्गावर बहुतांश ठिकाणी गावापासून बऱयाच अंतरावर बस थांबे बांधण्यात आले आहेत. महामार्गांवरील साकतखुर्द, शिराढोण, वाळुंज, तुक्कडओढा याठिकाणी एका साईडने गाव सोडून बऱयाच अंतरावर बसथांबे बांधण्यात आली आहेत. यातील बरेच बसथांबे निर्जन ठिकाणी बांधले आहेत. हे बसथांबे गाव सोडून भलतीकडे का बांधले असावे हे न उलगडणारे कोडे आहे. परंतु, यामुळे प्रवास करणाऱया नागरिकांची पायपीट वाढली असून, निर्जन ठिकाणी बांधलेल्या बसथांब्यामुळे महिला, तसेच शाळकरी मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढणार आहे.

गावकऱयांसाठी अपघातांचा धोका वाढला

– महामार्गावर रुईछत्तीसी येथे बाह्यवळण रस्ता करण्यात आला आहे. या गावात दर रविवारी मोठा बाजार भरतो. तसेच शाळा, महाविद्यालय, बँक आदींमुळे शेजारील वाटेफळ, साकत, दहिगाव तसेच नगरहून येणाऱयांची संख्या जास्त आहे. बाह्यवळण रस्त्याजवळ गावात प्रवेश करताना धोकादायकपणे रस्ता ओलांडून गावात प्रवेश करावा लागणार असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे रुईछत्तीसीकरांसाठी ही एक धोक्याची घंटाच आहे.

शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ

– साकतखुर्द येथे अजूनही एक साईडचा सर्व्हिस रस्ता नसल्याने महामंडळाच्या एसटी बस उड्डाणपुलावरून जात आहेत. त्यामुळे शाळेतून परतलेल्या मुलांना उड्डाणपुलाच्या पायथ्याला उतरवले जात आहे. तेथे उड्डाणपुलाचा उतार असल्याने वाहने भरधाव वेगाने जातात. या उताराला अतिशय धोकादायकरीत्या रस्ता क्रॉस करून मुले गावाच्या दिशेने प्रवेश करतात. त्यामुळे मुलांच्या जीवाशी हा एकप्रकारे खेळच असून, एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.