मराठवाड्यात मुसळधार, 233 मंडळांत अतिवृष्टी; हिंगोलीत कयाधूच्या पुराचे पाणी शेतात घुसले, नांदेड, जालन्यात जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
हिंगोली जिल्हयात यंदा पावसाळ्याच्या मोसमात पहिल्यांदाच कयाधू नदी दुथडी भरून वाहिली. कयाधूच्या पुराचे पाणी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव शिवारातील शेकडो हेक्टरमध्ये शिरले. समगा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वा रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत पावसाने झड लावली असून २३३ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोलीत कयाधू नदीच्या पुराचे पाणी काठालगत असलेल्या शेतांमध्ये घुसले असून नांदेड, जालन्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड, लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने बहार केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यंदा अल् निनोचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे पर्जन्यमानात घट होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात अल् निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडणार असल्याचे सांगितले होते. पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला हात घालू नये, अशी सूचना कृषी खात्याकडून देण्यात आली. जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली. सुरुवातीला बरसून पाऊस गायब झाल्याने शेतशिवारावर चिंतेचे ढग जमले होते. जुलैच्या अखेरपर्यंत पावसाने चढउतारच दाखवला. त्यामुळे कापूस, सोयाबीनची वाढ खुंटली. पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट उभे राहिले.

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील निसर्गरम्य सहस्रकुंड धवचबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत आहे, यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यांच्या वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून, धबधब्याचे त्रिधारांनी कोसळणारे विहंगम दृश्य पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे. हे मनोहारी दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

(छाया: अनिल मादसवार)