
राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदारांनी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आज केले आहे. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार गणना अर्ज भरून स्वाक्षरी केलेल्या मतदारांची नावे 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नोंदवता येत नाही. त्यामुळे ज्यांची नावे एकाहून अधिक ठिकाणी असतील त्यांनी सध्याच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणासाठीच गणना अर्ज भरावा. इतर ठिकाणच्या अर्जावर ‘आधीच नोंदणीकृत’ अशी नोंद करून त्या ठिकाणी नाव समाविष्ट केले जाणार नाही, असे मुख्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रारूप मतदार यादीत पात्र असूनही नाव नसलेल्या किंवा नव्याने मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांना 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 या कालावधीत नमुना क्र. 6 भरून नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.






























































