Breaking – जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार, सहाय्यक उपनिरीक्षकासह चार जण ठार

जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. पालघरजवळ ही घटना घडली असून यात आरपीएफच्या सहाय्यक उपनिरीक्षकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन प्रवाशांचाही समावेश आहे. याप्रकरणी आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन याला अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये (रेल्वे क्र. 12956) सोमवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास गोळीबार झाला. कोच क्र. 5मध्ये प्रवासी आणि जीआरपी-आरपीएफमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाला. यात आरपीएफच्या सहाय्यक उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. टीकाराम असे आरपीएफच्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव असून चेतन असे आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचे नाव आहे. सध्या ही पॅसेंजर मुंबई सेंट्रल स्थानकावर थांबवण्यात आली असून रेल्वे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

रेल्वेने याबाबत माहिती देताना सांगितले की, पालघर रेल्वेस्थानकवरून पॅसेंजर पुढे गेल्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनने धावत्या गाडीत गोळीबार केला. त्याने आरपीएफच्या सहाय्यक निरीक्षकासह तीन प्रवाशांवर गोळी झाडली आणि स्वत: दहिसर रेल्वेस्थानकाजवळ बाहेर उडी घेतली. पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलला हत्यारासह अटक केली आहे.

दरम्यान, बोरिवली स्थानकाजवळ पॅसेंजरमधून मृतदेह खाली उतरवण्यात आले आणि त्यानंतर शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच रेल्वे स्थानकावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)