पीएपी, धारावीकरांच्या पुनर्वसनाला ठाम विरोध; मिंधे सरकारविरोधात मुलुंडवासीयांचा एल्गार

एकाच वेळी 4 लाख धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आल्यामुळे मुलुंडकरांनी आज जाहीर बैठक घेत मिंधे सरकारविरोधात एल्गार केला. विविध प्रकल्पग्रस्त आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱया रहिवाशांना आमचा ठाम विरोध राहील. मुलुंडमध्ये पायाभूत सोयीसुविधांचा मोठा बिकट प्रश्न निर्माण होऊन परिस्थिती चिघळेल. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा नाही तर मुलुंडमध्ये मते मागायला येऊ नका, असा इशारा आज झालेल्या जाहीर बैठकीत मुलुंडवासीयांनी सरकारला दिला.

मुलुंडमध्ये मुंबई महापालिकेच्या 64 एकर जागेवर धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 4 लाख लोकांना वसवण्यात येणार असून त्यासाठी गृहनिर्माण विभागाने मुंबई महापालिका आणि नगरविकास विभागाला तशा सूचना केल्या आहेत. मिंधे सरकारच्या या निर्णयामुळे मुलुंडकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी मुलुंडकरांनी केली आहे.

3 फेब्रुवारीला मानवी साखळीचे आयोजन

धारावीकरांच्या मोठय़ा संख्येने मुलुंडमध्ये होणाऱया पुनर्वसनाबाबत मुलुंडमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने होणारे हे पुनर्वसन मुलुंडकरांसाठी किती घातक आहे, याबाबत आता घराघरात जाऊन जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर 3 फेब्रुवारीला मुलुंडमध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती बैठकीचे आयोजन करणारे अॅड. सागर देवरे यांनी दिली.