नगर जिल्हय़ातून बाहेर चारा वाहतुकीला बंदी

जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणांत पाण्याची आवक सुरू आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी पुरेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. समाधानकारक पावसाअभावी फक्त 35 टक्के पेरणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी उत्पादित झालेला चारा जुलैअखेरपर्यंत पुरणार आहे. पावसाने दडी मारल्यास चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून जिह्यातून बाहेर चारा वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून सोमवारी आदेश जारी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

नगर जिह्यात सध्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. आगामी कालावधीत पिण्याचे पाणी आणि चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवारी (दि. 14) जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जि.प.चे सीईओ आशीष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, मुळा कार्यकारी अभियंता सायली पाटील, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, नगरपालिकेचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर उपस्थित होते.

नगर जिह्यात सध्या 14 टक्के बाजरी, 43 टक्के मक्याची पेरणी झाली आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यात हा चारा उपलब्ध होणार आहे. याशिवाय पावसामुळे शेताच्या बांधावर गवत उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत चाराटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिह्यातील हिरवा, कोरडा, मुरघास टीएमआर आदी चारा जिह्यातून बाहेर वाहतुकीस बंदी घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत सोमवारी आदेश जारी होणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

जिह्यातील नऊ लहान-मोठय़ा धरणांत एकूण 38 टक्के पाणीसाठा आहे. सध्या अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांत पाण्याची आवक सुरू आहे. सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता, पुढच्या पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या 53 टँकर धावत आहेत. आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. हे गृहित धरून, जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी 18 कोटींचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांत उपाययोजना करण्यासाठी निधी कमी पडणार नसल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी बैठकीत नमूद केले.

चारावाढीसाठी प्रयत्न सुरू

चारा उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत 1 कोटी रुपयांचे बियाणे खरेदी केले जाणार आहे. त्यातून दोन महिन्यांत चारा उपलब्ध होणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठालाही चारा उत्पादन करण्याचे आदेश दिले आहेत. पाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणच्या बीजगुणन केंद्रांत चारा तयार करण्यात येणार आहे. जिह्यात दोन कृषी विज्ञान केंद्रे आहेत. बियाणे उपलब्ध करून चारा उत्पादित केला जाणार आहे.