विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक आक्रमक; तीन दिवस ग्रामपंचायतींचे सर्व कामकाज होणार ठप्प

सरकार दरबारी प्रलंबित विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याने नगर जिल्ह्यात 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत तीन दिवस ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प होणार आहे. सरपंच व ग्रामसेवक संघटनेने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. राज्यपातळीवर ग्रामपंचायत कार्यालये बंद राहणार असून नगरमध्येही सर्व ग्रामसेवक आंदोलनात सहभागी होत एकही काम करणार नाहीत, अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे नेते एकनाथ ढाकणे यांनी दिली आहे.

एकनाथ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रामसेवक संघटनेची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत तीन दिवसीय बंदचा निर्णय घेण्यात आला. सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत गाव पातळीवरील कर्मचारी, पदाधिकाऱ्यांच्या न्याय प्रश्नांची सोडवणूक होण्याकरता शासनाचे लक्ष वेधण्याकरता तीन दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय राज्यस्तरावरावर घेण्यात आला आहे.

या बंद काळात ग्रामसेवक कोणत्याही प्रकारच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. सरपंच संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, संगणक परिचालक संघटना ,ग्राम रोजगार सेवक संघटना आणि ग्रामसेवक संघटना यांच्या या संयुक्त आंदोलनामुळे गाव कारभार ठप्प होणार आहे. नियमित कामकाज करीत असताना अतिरिक्त कामाचा प्रचंड ताण प्रामुख्याने ग्रामसेवकांवर येत आहे. तो ताण कमी झाला पाहिजे. ज्या ज्या विभागाचे कामे आहेत, त्या त्या विभागांनी केली पाहिजेत. परंतु जिल्हा प्रशासन ग्रामसेवकांना सक्ती करत आहे. या सक्तीमुळे ग्रामसेवक तणावात असून मानसिक त्रास होत आहे. ग्रामसेवकांच्या वेतन त्रुटी प्रश्नाकडे सातत्याने सरकारचे दुर्लक्ष होत आहे. एक गाव एक ग्रामसेवक पद निर्मिती होत नाही. विस्तार अधिकाऱ्यांच्या जागांमध्ये वाढ होत नाही. यासह अनेक प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु त्यावर काहीच कार्यवाही होत नसल्याने महाराष्ट्रामध्ये 22 हजार ग्रामसेवक 27 हजार 536 ग्रामपंचायतींचे कामकाज तीन दिवस बंद ठेवून असंतोष व्यक्त करणार आहेत, अशी माहिती एकनाथ ढाकणे यांनी दिली.