मुंबईतील हिरे व्यापार आपल्या डोळ्यांदेखत गुजरातला पळवला; रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

गुजरातमध्ये रविवारी सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सूरत डायमंड बोर्स जगातील सर्वांत मोठे कार्यालय ठरले आहे. गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. सूरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी आता सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील हिरे व्यापार सूरतला पळवून नेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारला जाब विचारला आहे. या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते रविवारी सूरतमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या ‘डायमंड बोर्स’चे उद्घाटन करण्यात आले याबद्दल गुजरात सरकारचे अभिनंदन करावे की मुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळ्यांदेखत पळवला गेला याचे दुःख व्यक्त करावे हेच समजेनासे झालंय. मुंबईतला हिरे व्यवसाय संपवून सूरतच्या हिरे व्यवसायाला ताकद दिली जात असताना आपले सत्ताधारी आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेत राहिले, अशी सणसणीत टीका रोहित पवारांनी केली आहे.

खुर्चीचा विषय असला तर दिल्लीला पन्नास चकरा मारता, दिल्लीचे पाय धरता आणि महाराष्ट्राच्या हिताचा विषय असतो तेव्हा मात्र बिळात लपून बसता, हाच का तुमचा मराठी बाणा आणि हाच का तुमचा स्वाभिमान? भाजपसाठी आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांसाठी केवळ सत्ता महत्त्वाची आहे का? महाराष्ट्राच्या अस्मितेची तुमच्या लेखी काही किंमत नाही का? अजून काय काय गहाण टाकणार? किमान महाराष्ट्रासाठी थोडा तरी स्वाभिमान दाखवा, असेही रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे.