महाराष्ट्रात मराठा समाज शिल्लकच राहणार नाही; छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने खळबळ

chhagan-bhujabal-obc-reserv

राज्यातील सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसींमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहेत. त्यामुळे कुठल्याही उपायांची गरज आहे, असे मला वाटत नाही असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

सगळेच मराठा जर कुणबी होणार आहेत तर मग क्युरेटिव्ह पिटिशन करा किंवा बिल आणा पण बाहेर कोण राहणार आहे? आयोगाचे लोकही राजीनामा देत आहेत. हा ओबीसींचा आयोग राहिलाच नाही हा मराठ्यांचा आयोग झाला आहे, असेही भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे पाटील माझ्याविरोधात रोज बोलतो कारण त्याशिवाय त्याच भाषण कुणी ऐकणार नाही. हरिभाऊ राठोड गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत, असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला.

सध्याच्या घडीला दादागिरीने कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. खोटी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. तसेच पुढेही होणार आहे. यापुढेही जातपडताळणीच्या वेळी हेच होणार आहे. दादागिरी करणार आणि अशीच प्रमाणपत्रे घेतली जाणार आहेत. ओबीसींवर चर्चा घेऊन काय करायचे? आता सगळे मराठा ओबीसी होणार आहेत. त्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरु आहेत. न्यायमूर्ती शिंदे गावांमध्ये फिरून हे करा ते करा सांगत आहेत. सगळेच ओबीसी होणार आहेत. महाराष्ट्रात मराठा शिल्लकच राहणार नाहीत महाराष्ट्रात सगळे कुणबी होणार. मनोज जरांगेला कुणीतरी उंचीवर घेऊन जात आहे. त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत हेच कारण आहे त्यामागे, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.