राज्यात उन-पावसाचा खेळ सुरूच; काही ठिकाणी उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी ‘यलो अलर्ट’

राज्यासह देशातील हवामानात बदल दिसून येत आहेत. उत्तर हिंदुस्थानातील अनेक राज्यांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येत आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरही होत आहे. हवामान खात्याने देशातील काही राज्यात मुसळधार पावसाचा तर काही राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातही उन-पावसाचा खेळ सुरू असून काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मराठवाडा, विदर्भात गारपिटीसह काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच किनारपट्टीच्या भागातही पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, परभणी, जालना, हिंगोली या भागातही पावसाची शक्यता आहे. तर पुणे, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यांना उष्णतेच्या यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

देशात सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आगे. ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांचा गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.