मराठ्यांनो, राजकारण्यांच्या नादी लागू नका – जरांगे पाटील

मराठ्यांनो, राजकारण्याच्या नादाला लागून आपल्या जीवनाचे वाटोळे करून घेऊनका, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. पूर्णा तालुक्यातील गौर येथे संवाद बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठीच्या संघर्षास मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद ऐतिहासिक राहिला. मराठा समाज त्यातून एक झाला, ती एकजूट आता महत्त्वाची आहे. आरक्षणासाठी सगेसोयर्‍याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याकरिता निर्णायक लढाईची गरज आहे. तो लढा आपण सर्वजण एकमुखाने लढू, आपल्याविरुद्ध अनेक षड्यंत्र झाले. परंतु, आपण ते हाणून पाडले. आपण कधीही मागे हटलो नाही. मरेपर्यंत हटणारही नाही, असेही ते म्हणाले.

8 जून रोजी बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे सभा होणार आहे. त्यासाठी 900 एकर जमिनीवर सभेच्या दृष्टीने सर्वतोपरी नियोजन केले जाणार आहे. मराठाबांधवांची ही सभा रेकॉर्डब्रेक व ऐतिहासिक व्हावी या दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मराठाबांधवांनी सतर्क रहावे, जागरूक रहावे, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणीही शांत बसू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने जरांगे यांचे पूर्णा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पूर्णा टी पॉइंट, देवगाव फाटा, एरंडेश्वर, कात्नेश्वर, माटेगाव तसेच नांदेड रस्त्यावरील चुडावा भागातही त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणांनी संवाद सभास्थान व स्वागत स्थान दुमदुमले.