54 लाख नोंदींचे काय झाले? मनोज जरांगे संतापले

राज्यभरात54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचे म्हणता, कुठे आहेत या नोंदी? एकाही ग्रामपंचायतीने किती नोंदी मिळाल्या याची माहिती फलकावर लावलेली नाही. जमत नसेल तर सरळ उठून जा… मनोज जरांगे पाटील यांनी भरबैठकीत सरकारच्या नाकर्तेपणाचा पंचनामा करताच मध्यस्थीसाठी आलेले आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी आंतरवालीतून काढता पाय घेतला.

मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्याचा मुहूर्त आता 48 तासांवर येऊन ठेपला आहे. मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी सरकारने हरतर्‍हेचे प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे विश्वस्त मंगेश चिवटे हे जरांगे यांच्याशी चर्चा करत आहेत. कालच हे दोघे अधिसूचनेचा बदललेला मसुदा घेऊन आले होते. मात्र जरांगे यांनी मसुद्यात सगेसोयरे शब्दाची नीट व्याख्या करण्यात आली नाही, त्यामुळे हा मसुदा स्वीकारण्याजोगा नसल्याचे जरांगे यांनी म्हटले होते.

आज सायंकाळी पुन्हा आमदार बच्चू कडू, मंगेश चिवटे, उपायुक्त अनंत गव्हाणे आदी शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आंतरवालीत पोहोचले. आमदार बच्चू कडू यांनी बदललेला मसुदा जरांगे यांच्यासमोर ठेवला. त्यावर जरांगे यांनी मसुद्याचे ठीक आहे. 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचे म्हणता, कुठे आहेत या नोेंदी? त्यावर आमदार बच्चू कडू यांनी ग्रामपंचायतींनी सापडलेल्या नोंदीची यादी डकवली असल्याचे सांगितले. त्यानंतर जरांगे यांनी लगेच तीन ते चार गावांत थेट फोन लावून अशी काही यादी लागली आहे का, अशी विचारणा केली. याद्या लागल्याच नसल्याचे समोर येताच सरकारच्या शिष्टमंडळाचे चेहरेच पडले.

विभागीय आयुक्तांना झापले

आमदार बच्चू कडू यांनी बैठकीतूनच विभागीय आयुक्तांना फोन लावून सापडलेल्या कुणबी नोेंदीच्या याद्या लागल्या नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पत्रके काढता आणि आम्हाला तोंडावर पाडता, असे म्हणत त्यांनी आयुक्तांना झापले. जिल्हाधिकारी काय झोपा काढतात का? काम न करणार्‍या तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, हुशार झाले का, शहाणपणा शिकवू नका, असेही आमदार कडू म्हणाले. संबंधित विभागाच्या सचिवांनाही आमदार कडू यांनी फोन करून सुनावले.

20 तारखेच्या आत प्रमाणपत्र वाटा, नसता…

सरकारकडे अजूनही दोन दिवसांचा वेळ आहे. 20 तारखेच्या आत54 लाख प्रमाणपत्र वाटा. किती प्रमाणपत्र वाटले याची माहिती द्या. नसता आमचे तर ठरलेले आहेच. त्यात कोणताही बदल होणार नाही. 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आम्ही आंतरवालीहून मुंबईकडे कूच करणार. त्यानंतर सरकारशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठा मुंबईहून परतणार नाही, असे मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला ठणकावून सांगितले.

चिवटेंची चिव चिव

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेले मंगेश चिवटे यांनी राज्य सरकार मराठा आरक्षणावर सकारात्मक असून, त्या अनुषंगाने अनेक निर्णय घेण्यात आल्याचे सांगताच मनोज जरांगे संतापले. सरकारने कोणता सकारात्मक निर्णय घेतला, असा प्रश्न विचारताच चिवटेंची चिव चिव बंद झाली.