काहींची नक्कीच झोप उडाली असेल! राजकीय घडामोडींबाबत रोहित पवार यांचे सूचक ट्विट

भाजपचे फोडाफोडीचे राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काहीजण सत्तेत सहभागी झाल्याने जनतेच्या मनात रोष आहे. जनता या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली आहे. जनतेचा हा रोष स्पष्टपणे दिसून येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवार यांनी सूचक संकेत देणारं ट्विट केले आहे. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

एका समूहाच्या केलेल्या सर्व्हेने राज्यातील जनतेचा मूड दाखवून दिला आहे. एकदा नाहीतर दोन वेळा एवढ्या कुरापती करूनही अपेक्षित असा परिणाम मिळत नसल्याने हा सर्व्हे बघून काहींची झोप मात्र नक्कीच उडाली असणार, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. जनतेचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या विचारांचा मूड आणि भूमिका मात्र “क्रिस्टल क्लिअर” आहे. सत्ता आणि पैसा कधीही जनतेसमोर आणि विचारधारेसमोर टिकाव धरू शकत नाही, हेच या सर्व्हेतून अधोरेखित झाले. येणाऱ्या निवडणुकांमध्येही त्याचं प्रतिबिंब दिसल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजप आणि अजित पवार गटातील बंडखोरांना दिला आहे.