पाणीपुरवठा बंद केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नियमित कर भरलेला असतानाही ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा खंडित केला. या प्रकाराचा सरपंच व उपसरपंच यांना जाब विचारून परत येताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपंरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली. भाऊराव खोब्रागडे असे मृतकाचे नाव आहे. ग्रामपंचायतने गावातील जवळपास चाळीस घरांचा पाणीपुरवठा बंद केला. ग्रामपंचायतने पाणी कर भरण्याची पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या विठ्ठलवाडा येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार एका वृद्धाच्या जीवावर उठला आहे. ग्रामपंचायतने पाणीकर थकीत असल्याचे कारण पुढे करून गावातील चाळीस घरगुती नळांचा पाणी पुरवठा खंडित केला. याची पूर्व सूचना दिली नव्हती. गावातील भाऊराव खोब्रागडे यांनी नियमित पाणीकर भरले होते. कर भरणा केल्यावरही नळाचा पाणी पुरवठा खंडित झाल्याने खोब्रागडे यानी सरपंच, उपसरपंचाचे घर गाठले व त्यांना जाब विचारला. मात्र घरी येताना त्यांना हार्ट अटॅक आला. त्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. पाणिकर भरूनही नळ कापल्याने खोब्रागडे विचलित झाले होते. त्यांच्या मृत्यूला ग्रामपंचायत जबाबदार असल्याचा आरोप पत्नी मायाबाई यांनी केला आहे.

दारुड्या शिपायाची चूक

यासंदर्भात विठ्ठलवाडा ग्रामपंचायतचे सचिव कोडापे यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता ते म्हणाले, ही चूक शिपायाची आहे. नळाचा पाणीपुरवठा खंडित करण्याच्या कुठल्याच सूचना दिल्या नव्हत्या. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केलं.