सामना अग्रलेख – पंतप्रधान असताना काय केले?

मोठ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली. मोदींच्या सरकारने ही कर्जे माफ केली, पण शेतकऱ्यांच्या पाच-दहा हजारांच्या कर्जासाठी त्यांच्या घरांवर टाच आली. भाजपास पैसे देणाऱ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवून परदेशात पलायन केले. हे मोदींच्या राज्यात घडत आहे. अनेक प्रतिष्ठत लोक, व्यापारी या देशात राहणे नको म्हणून वैतागून दुसऱ्या देशात पलायन करीत आहेत. हा देश राहण्यालायक ठेवला नाही. लोक भयग्रस्त आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना निराशेने ग्रासले आहे. पंतप्रधान असताना मोदींनी काय केले?

पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्रात येणे-जाणे वाढले आहे. यात चुकीचे काहीच नाही. लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भाजपसाठी कमजोर राज्य आहे. त्यामुळे मोदींचे महाराष्ट्रावर जास्त लक्ष आहे. मोदी गुरुवारी शिर्डीत आले व नगर जिल्हय़ासह महाराष्ट्रातील 14 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजने झाली. यावर श्री. प्रकाश आंबेडकर यांचे भाष्य अत्यंत मार्मिक आहे. ‘‘गावच्या सरपंचाचा हट्ट असतो. गावातील प्रत्येक कामाचे उद्घाटन त्याच्याच हस्ते व्हावे. प्रत्येक कामाचे श्रेय त्यालाच मिळावे. मोदी हे त्या सरपंचाच्या भूमिकेत आहेत. त्याला कोणी काय करायचे?’’ श्री. प्रकाश आंबेडकरांचे हे म्हणणे खरेच आहे. मोदी शिर्डीत आले व पुन्हा एकदा खोटे बोलून गेले. त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतले नाही. पण त्यांनी सांगितले, ‘‘महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते, परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?’’ असा प्रश्न मोदी यांनी केला. मोदी यांनी पवार यांच्याबाबत आपण आधी काय बोललो व आता काय बोललो हे तपासून घ्यायला हवे होते. खरं तर मोदी सरकारनेच शरद पवार यांना कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देशातला दुसऱया क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ दिला व आता मोदी नेमके उलटे बोलत आहेत. गोंधळलेल्या मानसिकतेचे हे लक्षण आहे. ‘यूपीए’ सरकारच्या काळात पवार दहा वर्षे कृषिमंत्री होते. पंजाबराव देशमुखांनंतर लाभलेले पवार हे सर्वोत्तम कृषीमंत्री होते व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी उत्तम योजना राबवल्या. त्यात आता पडायचे नाही, पण मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत जे

बहुरंगी कृषिमंत्री

देशाला दिले त्यांनी काय केले? त्यांना शेतीतले किती कळत होते? सध्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना तर मोदी यांनी मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरवले. कृषिमंत्री पदाविषयी मोदी यांची ही आस्था आहे. कृषिमंत्री तोमर हे चंबळ खोऱयातील त्यांच्या विधानसभा निवडणुकीत अडकून पडले आहेत व देशाचे कृषी मंत्रालय वाऱयावर आहे. मोदी यांच्या कारकीर्दीत चार-पाच कृषिमंत्री झाले. ‘यूपीए’काळात सलग दहा वर्षे शरद पवार हेच देशाचे कृषिमंत्री होते. चार-पाच वर्षांपूर्वी मोदी हे पवार यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचे व नेतृत्व गुणांचे कौतुक करीत होते. पवार हे कृषिमंत्री असताना त्यांच्या गुजरातला कशी मदत करीत होते, त्याचे कीर्तन करीत होते. पवार यांचे बोट धरून आपण राजकारणात आलो वगैरे पुडय़ा सोडत होते. आज त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. मोदी यांच्या बोलण्यात व वागण्यात आगापिछा नसतो. चार महिन्यांपूर्वी त्यांनी अजित पवारांवर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा व शिखर बँकेच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. काल शिर्डीत तेच अजित पवार मोदी यांच्या शेजारी भाजपपुरस्कृत उपमुख्यमंत्री म्हणून बसले व अजित पवारांसमोर मोदी हे शरद पवारांची ‘बदनामी’ करीत होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान व अभिमान मेल्याचे हे चित्र आहे. पवारांनी काय केले याचे उत्तर अजित पवार हे आहे. पवारांनी घडवलेले अजित पवार हे मोदींच्या व्यासपीठावर होते व अजित पवारांना फोडले तरी 82 वर्षांचे पवार अजून मैदानात आहेत. याचे भय पंतप्रधानांना वाटते. पंतप्रधान मोदी यांनी देशासाठी काय केले? हा प्रश्न त्यांना विचारायला हवा. चीनने लडाखवर पाऊल ठेवले आहे,

कश्मिरात घुसखोरी

सुरू आहे. मोदी यांच्याच काळात ‘पुलवामा’ घडले. कश्मिरी पंडितांची घरवापसी होईल असे मोदींचे वचन होते. ते वचन पूर्ण झाले नाही. मोदी यांच्याच काळात गुजरातची दंगल पेटली व आता मणिपुरात आगडोंब उसळला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. मोदी सत्तेवर आले तेव्हा रुपयाचे मूल्य 55 रुपये होते. आज डॉलरच्या पुढे ते 82 रुपये आहे. मोदींनी काय केले? हा मुद्दा येथे उपस्थित होऊ शकतो. ‘‘आम्ही सत्तेवर आल्यावर शेतकऱयांना शेती करताना जो खर्च करावा लागतो त्या सगळ्या खर्चाचा हिशेब केला जाईल. त्यावर पन्नास टक्के नफा मिळवला जाईल आणि मग जो आकडा येईल तो सरकारने दिलेला हमीभाव असेल.’’ इतके निःसंदिग्ध आश्वासन 2014 साली सर्वच प्रचार सभांतून नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्याचे काय झाले? शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे तुमचे वचन होते ते झालेच नाही, पण शेती व शेतकऱयांना गुलाम करणारे तीन काळे कृषी कायदे मोदी यांनी आणले. शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर ते कायदे मागे घेतले. आता बोला! मोदींच्या काळात सार्वजनिक उपक्रम बंद पडले, बेरोजगारी वाढली. आधी होत्या त्या नोकऱया गेल्या. मोठय़ा उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली. मोदींच्या सरकारने ही कर्जे माफ केली, पण शेतकऱयांच्या पाच-दहा हजारांच्या कर्जासाठी त्यांच्या घरांवर टाच आली. भाजपास पैसे देणाऱया उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवून परदेशात पलायन केले. हे मोदींच्या राज्यात घडत आहे. अनेक प्रतिष्ठत लोक, व्यापारी या देशात राहणे नको म्हणून वैतागून दुसऱया देशात पलायन करीत आहेत. हा देश राहण्यालायक ठेवला नाही. लोक भयग्रस्त आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना निराशेने ग्रासले आहे. पंतप्रधान असताना मोदींनी काय केले?