एसटी बस-मारुती इर्टिगाची टक्कर; श्रीगोंद्यातील चौघे ठार

एसटी बस आणि मारुती इर्टिगा मोटारीची समोरासमोर टक्कर होऊन श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील चौघे जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले. श्रीगोंदा-शिरूर रोडवरील ढवळगाव परिसरात आज दुपारी हा अपघात झाला. अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पारगाव सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ लक्ष्मण ननवरे (वय 55), पारगाव सेवा संस्थेचे सदस्य हरी तुकाराम लडकत (वय 60), ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बापूराव मडके (वय 55), दत्तात्रय बळीराम खेतमाळीस (वय 60, चौघेही रा. पारगाव सुद्रीक, श्रीगोंदा) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर इर्टिगाचालक विठ्ठल गणपत ढोले (वय 36, रा. लोणी व्यंकनाथ), रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस (वय 70), रोहिदास सांगळे (वय 72) अशी जखमींची नावे आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सेवा संस्थेचे पदाधिकारी आळंदी येथून देवदर्शन करून इर्टिगा मोटारीने पारगाव सुद्रीक गावाकडे परत येत होते. यावेळी दुपारी चारच्या सुमारास ढवळगाव परिसरातील कुकडी चारी क्रमांक 34च्या वळणावर इर्टिगा आणि श्रीगोंदा डेपोमधील श्रीगोंदा-बेलवंडी-शिरूर एसटीची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात इर्टिगामधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह तिघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती  समजताच, बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारे यांनी कर्मचाऱयांसह घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघाताच्या घटनेमुळे पारगाव सुद्रिक गावावर शोककळा पसरली आहे.

आळंदी दर्शन करून येताना गावाजवळ काळाचा घाला

n एकादशी असल्याने पारगाव येथील आठजण इर्टिगा मोटारीतून आळंदी येथे माउलींच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर गाडीमधील गोपीनाथ हिरवे हे मुलाला भेटण्यासाठी आळंदी येथेच उतरले. उर्वरित सातजण परत पारगाव सुद्रीक गावाकडे येत होते. गावाजवळ आल्यानंतर काळाने घाला घातला.