सलमान खान गोळीबार प्रकरण; गोळीबारानंतर तीनदा बदलले कपडे

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सागर पाल आणि विक्की गुप्ताने वांद्रे, सांताक्रूझ आणि सुरत येथे कपडे बदलल्याची माहिती समोर आली आहे. त्या दोघांकडे 40 गोळ्या होत्या. त्यापैकी त्याने 5 गोळ्या झाडल्या. पोलिसांनी तपास करून एकूण 17 गोळ्या जप्त केल्या असून उर्वरित गोळ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

गोळीबार प्रकरणी सागर आणि विक्कीच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना कोर्टात हजर केले होते. पोलिसांनी तापी नदी येथून दोन पिस्तूल, चार मॅगझीन, जिवंत काडतुसे जप्त केली होती.या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तर दोन जणांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवले. गोळीबार करण्यापूर्वी आणि गोळीबार केल्यावर संपर्क करण्यासाठी तीन मोबाईलचा वापर केला होता. गुह्यात वापरलेला एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ते दोघे इंटरनेटच्या माध्यमातून एका जणाच्या संपर्कात होते. तो व्यक्ती कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.  विकीला आणि सागरला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.