उजनीतून 10 मे रोजी सोलापूरसाठी पाणी सोडणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दिनांक 10 मे रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचे मागणी पत्र देण्यात आलेले आहे. दिनांक २० मे पर्यंत उजनी धरणातील पाणी वरील बंधाऱ्यात पोहोचल्यास सोलापूर महापालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांना महापालिकेच्या वतीने वेळेत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक १० मे रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे. हे पाणी औज व चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी लागतो. अंदाजे साडेपाच टीएमसी पाणी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडले जाणार आहे.