शाहरूख खानने बॉलीवूड बरबाद केले, विवेक अग्रिनहोत्री यांचा आरोप

कश्मीर फाईल्सचे निर्माते विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी असतात. विवेक अग्निहोत्री यांनी आता आपला मोर्चा बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानकडे वळवला आहे. शाहरुख खानवर बॉलिवूड बरबाद केल्याचा आरोप विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे. शाहरुख खान जे राजकारण करतो ते मला आवडत नसल्याचे विवेक यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. शाहरुखने पीआर (जनसंपर्क) हाईप( वाढवून-चढवून गोष्टी सांगणे ग्लॅमर (चकचकीत) आणि स्टारडम (प्रसिद्धी) पुरता मर्यादीत केल्याचा आरोपा विवेक यांनी केला आहे.

इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे की, मी शाहरुख खानचा चाहता आहे हे तुम्हाला माहीत आहे का? मी नेहमी म्हणतो की त्याच्यासारखा कोणी बनूच शकत नाही. पण मला त्याचे राजकारण आवडत नाही. बॉलीवूडसारखी संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी तो जबाबदार आहे असे मला वाटते. विवेक यांनी म्हटलंय की शाहरुखने बॉलीवूडमधील सर्व काही उद्ध्वस्त केले आहे. बॉलीवूड फक्त पीआर, हाईप, ग्लॅमर आणि स्टारडमपुरता मर्यादीत झाले आहे. ज्याला प्रसिद्धी नाही त्याला स्वीकारले जात नाही ही समस्या निर्माण झाल्याचे विवेक यांनी म्हटले आहे.

विवेक यांनी म्हटले आहे की शाहरुख खानला वाटते की प्रेक्षक मूर्ख आहेत आणि त्याचे चित्रपट ‘पीपल्स फिल्म’ नाहीत. प्रेक्षकांना मूर्ख ठरवत चित्रपट बनविणं मला पटत नाही. मी लोकांसाठी चित्रपट बनवतो. ते (शाहरूख खान) बॉक्स ऑफिससाठी चित्रपट बनवतात. त्यामुळे जेव्हा चित्रपट यशस्वी होतो, तेव्हा तो शाहरुख खानचा चित्रपट ठरतो आणि जेव्हा माझा चित्रपट यशस्वी होतो, तेव्हा तो लोकांचा चित्रपट असतो जो हिट झालेला असतो.