सातारा जातीयवादी शक्तींकडे जाऊ देणार नाही, आमदार शशिकांत शिंदे यांची ग्वाही

सातारा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. सातारा मतदारसंघ जातीयवादी शक्तींच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी लोकसभा निवडणूक लढवत आहे, अशी ग्वाही देत सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर सातारची तुतारी निश्चितपणे दिल्लीत जाईल, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

सातारा लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या कराड उत्तरमधील प्रचाराचा शुभारंभ पाल येथील श्री खंडोबा मंदिरात झाला. त्यावेळी झालेल्या सभेत आमदार शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीनिवास पाटील होते. आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सारंग पाटील, डॉ. भारत पाटणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, ऍड. रवींद्र पवार, मानसिंगराव जगदाळे, कराडचे माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, संगीता साळुंखे आदी उपस्थित होते.

शशिकांत शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जिह्यात सर्वत्र फिरत असताना जनतेत अंडरकरंट जाणवत असून, लोकसभेला आपला विजय निश्चित आहे. त्यामुळेच भाजपने जिह्यात उमेदवार जाहीर करायला विलंब केला. ‘कोण विरोधात बोलायला लागला की त्याला आत टाकायचे,’ हा ट्रेंड सध्या देशात सुरू आहे. माझ्यासह बाळासाहेब पाटील यांनाही पक्षातून फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार असून, आम्ही शरद पवारांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. काल माझ्यावर ज्याने आरोप केले, त्याच्या शेजारी बसलेल्यांनी मेडिकल कॉलेजचे काम टक्केवारीसाठी बंद पाडले आहे, अशी टीका त्यांनी केली.

सातारा जिल्हा पुरोगामी विचारांचा व सुसंस्कृत जिल्हा आहे. मात्र, या जिह्याचे वातावरण गेल्या वर्षभरात बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण या सगळ्या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. सातारा जिह्यातील माथाडी कामगाराचा मुलगा व सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व म्हणून जिह्यातील जनतेने आपणास एक संधी द्यावी. या संधीचे सोने करू, अशी ग्वाही शशिकांत शिंदे यांनी दिली.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, भाजप सरकारने नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी विरोधी कायदे असे अनेक चुकीचे निर्णय घेतले असून, त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. लोकसभा निवडणुकीत देशातील वातावरण बदलत चालले असून, निश्चितपणे महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. शशिकांत शिंदे हे एखादा मुद्दा हातात घेतला तर तो सोडवण्यासाठी शेवटपर्यंत लढणारे नेतृत्व आहे. त्यांची उमेदवारी सर्वसामान्य जनतेपर्यंत गेली असल्याने त्यांच्याविरुद्ध सत्ताधारी षडयंत्र रचत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

माजी सभापती देवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर सर्जेराव खंडाईत यांनी आभार मानले.