महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेची पताका फडकवत ठेवणाऱ्या ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची, अध्यात्म क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याची भावना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. रसाळ कीर्तनकार हरपला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
बाबा महाराजांनी ज्ञानेश्वरी सोप्या व रसाळ भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली. दूरदर्शनद्वारे त्यांनी ज्ञानेश्वरी, भगवत् गीता घरोघरी पोहोचविली. त्यांच्या आवाजात गोडवा होता. त्या गोड आवाजाने जनतेला हरिपाठ ऐकण्याचे वेड लावले. संत साहित्याचा गाढा अभ्यास असणारे ‘प्रबोधन’वादी कीर्तनकार म्हणून बाबासाहेब सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी या महान कीर्तनकाराला श्रद्धांजली अर्पण केली आहे.