तीन मुलांना विहिरीत फेकून पित्यानेच केली हत्या; जालना येथील डोमेगावातील घटनेने खळबळ

जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोन मुली आणि एका मुलाला विहिरीत फेकून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी जालन्यामध्ये उघडकीस आली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. संतोष धोंडीराम ताकवले असे आरोपी पित्याचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोहम संतोष ताकवाले (12), शिवानी संतोष ताकवाले ( 8), दिपाली संतोष ताकवाले (7) अशी तीन मुलांची पित्यानेच हत्या केली आहे.

मृत तिन्ही भावंडे संभाजीनगर जिल्ह्यातील काद्राबाद येथील होते. कचनेर जवळील काद्राबाद ता. जि. संभाजीनगर येथील संतोष धोंडीराम ताकवाले गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी आरोपी संतोष ताकवाले त्याच्या 3 मुलांसह अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे आला होता. त्याने गावातील विलास आसाराम सोळुंके यांच्या शेत गट क्रं. 198 या शेतातील विहिरीमध्ये तिन्ही मुलांना फेकत त्यांची हत्या केली होती. या विहिरीत आठ ते दहा फूट पाणी होते. तिन्ही मृतदेह रविवारी पाण्यावर तरंगत असलेल्याने ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर तो फरार झाला होता.

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिन्ही मृतदेह बाहेर काढले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी संतोषला छत्रपती संभाजीनगर येथील बाबा पेट्रोल पंप येथून ताब्यात घेतले. त्यानंतर संतोष याने संबंधित घटनेबाबत स्वतःच पोलिसांना माहिती दिली. त्याने यापूर्वी एका महिलेचा खून केल्याची माहिती तपासात समोर आली. जन्मदात्यानेच त्याच्या मुलांची हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.