IPL 2024 – कोहली-गंभीरमध्ये पॅचअप झालं की नाटक केलं? गावसकरांच्या विधानानं चर्चांना उधाण

इंडियन प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघामध्ये सामना रंगला. जवळपास एकतर्फी झालेला हा सामना कोलकाताने 7 विकेट्सने जिंकला. मात्र या लढतीमध्ये सर्वात जास्त लक्षात राहिला तो क्षण म्हणजे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील गळाभेट. गेल्यावर्षीच्या हंगामात यो दोन्ही खेळाडूंमध्ये वादाचा भडका उडाला होता. त्यामुळे आता त्यांचे पॅचअप झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र यावर सुनील गावसकर आणि रवी शास्त्री केलेल्या टिप्पणीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या या लढतीत बंगळुरूने प्रथम फलंदाजी केली. सलामीला आलेल्या विराट कोहलीने एक बाजू लावून धरली होती. यादरम्यान अडीच मिनिटांचा स्ट्रॅटेजीक टाईम आऊट घेण्यात आला. कोलकाताचे सर्व खेळाडू आणि बंगळुरूचे फलंदाज पाणी-कोल्डड्रिंक पित असतानाच गौतम गंभीर मैदानात आला आणि थेट विराट कोहलीजवळ गेला. दोघांमध्ये पुन्हा काहीतरी घडतंय की काय असे वाटत असतानाच गंभीरने कोहलीची गळाभेट घेतली आणि एकमेकांशी हसतखेळत गप्पाही मारू लागले.

कोहली आणि गंभीरच्या पॅचअपचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला. ब्रॉडकास्टर्सनीही हा व्हिडीओ अनेकदा दाखवला. यादरम्यान रवी शास्त्री यांनी एक टिप्पणी केली. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील गळाभेटीसाठी केकेआरला फेअरप्ले पुरस्कार द्यायला हवा असे ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

रवी शास्त्री यांच्यासोबत सुनील गावसकरही समालोचन करत होते. त्यांनीही शास्त्रींची रि ओढत फक्त फेअरप्ले पुरस्कार नाही तर ऑस्करही दिला पाहिजे, असे म्हटले. यामुळे दोघांमध्ये नक्की पॅचअप झाले की हे फक्त नाटक होते असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.