अमरनाथ यात्रेला गेलेले श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील 55 जण रस्ता खचल्यामुळे अनंतनाग जिह्यामध्ये अडकले आहेत. प्रशासनाने त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. अमच्यासोबत हजारो भाविक अडकून पडले आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
बेलापूर येथील विजय भगत यांच्यासह 55 जण अमरनाथ यात्रेला गेले आहेत. अतिवृष्टीमुळे अनंतनाग जिह्यातील एका भागामध्ये रस्ता खचला आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला आहे. तेथील प्रशासनाच्या एका छावणीमध्ये हे सर्वजण थांबले आहेत. त्यांची तेथे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, हजारो लोक यात्रेत अडकल्यामुळे अनंतनाग येथून जम्मूपर्यंतचा प्रवास कठीण झाला आहे. एकाच वेळेस सर्व यात्रेकरूंना बाहेर काढण्याचे काम सोपे नाही, अशी माहिती विजय भगत यांनी दिली. दिल्ली येथून सर्व यात्रेकरूंचे रेल्वे आरक्षण केले होते. मात्र, आपण अजूनही अडकून पडलो आहोत. त्यामुळे प्रशासनाने दिल्ली येथून नव्याने रेल्वेची व्यवस्था करावी, अशी मागणी भाविक करीत आहेत.