ठसा – मोहन भाकरी

>> दिलीप ठाकूर

चित्रपटसृष्टीतील अनेक वैशिष्टय़ांतील एक म्हणजे, येथे सुपरहिट चित्रपटांचा फॉर्मुला आपणही पडद्यावर आणावा असे वाटणारे (त्याची जणू नक्कल करणारे) आणि त्यानुसार तशी वाटचाल करणारे पटकथाकार, निर्माता व दिग्दर्शक आहेत आणि तेदेखील बरीच वर्षे कार्यरत राहतात. निर्माता व दिग्दर्शक मोहन भाकरी हेदेखील अगदी तसेच. 18 एप्रिल 2024 रोजी त्यांचे निधन झाले. भयपट (हॉरर पिक्चर), भूतपट (भुताचा आभास वगैरे) असे चित्रपट म्हणजे हमखास रामसे ब्रदर्सचे नाव समोर येते. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अशा पध्दतीच्या ’घाबरवून टाकणाऱया चित्रपटां’ची त्यांनी जणू फॅक्टरीच उघडली होती. आणि त्यांच्या चित्रपटांना बी आणि सी केन्द्रांवर (छोटी शहरे, ग्रामीण भाग, टूरिंग टॉकीज) सातत्याने यश प्राप्त होतेय म्हटल्यावर त्यांना कोणी आपला जणू आदर्श मानलेच तर त्यात आश्चर्य ते काय? मोहन भाकरी हे अगदी तसेच होते. त्यांनीही भयपट निर्मितीला प्राधान्य दिले. योगायोग कसा असतो बघा. आठवडाभरापूर्वीच सात रामसे बंधूंमधील गंगू रामसे यांचे निधन झाले आणि त्यापाठोपाठ मोहन भाकरी यांचे निधन झाले. मोहन भाकरी यांनीदेखील ऐंशीच्या दशकात भयपट निर्मितीला प्राधान्य दिले. त्यांच्या चित्रपटांची नावेदेखील काहीशी रामसे बंधूंच्या चित्रपटासारखीच. खुनी महल, अमावस की रात, चीख, इन्सान बना शैतान, कब्रस्तान, खुनी मुर्दा, अपराधी कौन, सौ साल बाद, खुनी महल इत्यादी. आता एवढय़ा भयपटांसाठी गोष्टी आणणार कुठून हा प्रश्न असला तरी एकदा का आपली विषयाची चौकट ठरली की त्यात स्मशान, भटकती आत्मा, प्राण्यांचे मुखवटे, भला मोठा महाल, दिव्यांचे कधीही येणे जाणे, अंधारातील आभास, भयावह गेटअपची व्यक्तिरेखा, किंचाळी, जोरदार शोरदार पार्श्वसंगीत आणि भडक पोस्टर हे सगळेच या भयपटासाठी उपयुक्त ठरे. आणि एकदा का हेच करायचे ठरल्यावर त्यातील आत्मविश्वास वाढत राहतो. मोहन भाकरी यांचे तेच झाले म्हणूनच ते तीन दशके चित्रपट निर्मितीत टिकून राहिले. आपलं स्थान निर्माण करू शकले. अगदी त्यांनी दो मदारी, जीजा साली, पाच फौलादी असे काही मसालेदार मनोरंजक चित्रपट, मौला जट्ट वगैरे पंजाबी चित्रपटही निर्माण केले. असे दीर्घकाळ टिकून राहणेही खूप महत्त्वाचे व काwतुकास्पद आहे. अशा भयपटात भूमिका साकारण्यास अनेक कलाकारही उपलब्ध असतात आणि चित्रपट निर्मितीत सातत्य राहते. मोहन भाकरी यांच्या चित्रपटात अमजद खान तर झालेच, रझा मुराद, दीपक पराशर, जावेद खान, सतीश कौल, कुनिका, हेमंत बिर्जे, राम मोहन, तेज सप्रू, भरत कपूर, उपासना सिंग, बिरबल इत्यादींनी अनेकदा काम केले. भयपटात मेकअप व कला दिग्दर्शन यांना भरपूर संधी असते. मोहन भाकरी यांनी याचे भान व ज्ञान ठेवून यश प्राप्त केले. चित्रपटाच्या जगात यश हेच सर्वात चलनी नाणे असते, ते मोहन भाकरी यांना चांगलेच साध्य झाले.