राज्यातील कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. तसेच लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असा इशारा राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये कोरोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. कोरोना वेगाने पसरतो आहे. त्यामुळे हे नियंत्रण लोकांच्या हातात आहे. आपण कसे राहायचे, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये हे लोकांनी ठरवायचे आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.’