देवेंद्र फडणवीस हेच भुजबळांचा बोलविता धनी! मराठा समाजाचे दांगट, दळवी यांचा आरोप

‘मराठा समाजाबद्दल जो आकस आहे, तो ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांच्यामार्फत दिसून आला आहे. देवेंद्र फडणवीस हेच भुजबळांचा बोलविता धनी असून, भुजबळच ओबीसींचे आरक्षण संपवायला निघाले आहेत,’ असा आरोप सकल मराठा समाजाचे गजेंद्र दांगट आणि गोरख दळवी यांनी पत्रकार परिषदेत केला.

मराठा प्रस्थापितांकडेच ओबीसीचे सर्टिफिकेट आहे व हेच मराठा घराणेशाही करीत असल्याने मराठा समाजाचे नुकसान झाले आहे. आता हे सर्व मराठा आमदार पडले तरी चालतील. आता न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी आमची भूमिका आहे.

छगन भुजबळ यांनी शनिवारी नगर येथील सभेमध्ये केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज गजेंद्र दांगट आणि गोरख दळवी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राम जरांगे, परमेश्वर पाटील, शशिकांत भामरे, स्वप्नील दगडे आदी उपस्थित होते.

गजेंद्र दांगट म्हणाले, ‘कालचा ओबीसी मेळावा हा मराठाद्वेष करण्यासाठी बोलाविला होता, असे दिसून आले. फक्त मराठा समाजावर बोलायचे, असा एकच कार्यक्रम त्यांचा सुरू होता. लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांचा इतिहास आणि अस्तित्व सर्वांना माहीत आहे. भुजबळांचा इतिहास हा पक्ष बदलण्याचा व कोलांटउडी मारण्याचा आहे,’ असा आरोप त्यांनी केला.

‘सरकारला मराठय़ांना आरक्षण द्यायचे नाही. ते वेळकाढूपणा करीत आहेत. त्यांना प्रस्थापित मराठा चालतात. मात्र, गरीब मराठा का चालत नाहीत?’ असा सवाल गोरख दळवी यांनी केला. ‘भुजबळ यांनी राजीनामा दिला, असे सांगितले, मग त्यांनी सरकारी गाडी व संरक्षण का घेतले?’ असा सवाल त्यांनी केला. ‘भुजबळांचा बोलविता धनी फडणवीस हेच असून, या सरकारमध्ये झालेली महायुती अभद्र आहे. कोण कोणाचा कधी वापर करतो, हे कळत नाही. नेमके काय निर्णय घ्यायचे, हे यांना कळत नाही,’ असा टोला त्यांनी लगाविला.