मुंबई महापालिकेच्या सहा हजार कोटींच्या मुदत ठेवींवर मिंध्यांचा डल्ला; मुंबई काँग्रेसचा आरोप

मिंधे सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या सहा हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवींवर डल्ला मारल्याचा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसने केला आहे. हा पैसा कुणाच्या घशात गेला की सुशोभीकरण आणि जाहिरातबाजीवर उधळला गेला हे सरकारने स्पष्ट करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.

मुंबई महानगरपालिकेवर सरकारने आयुक्तांना प्रशासक म्हणून नेमले आहे. या प्रशासकांच्या माध्यमातून मिंधे सरकारने मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी केली आहे. 2021-22 च्या तुलनेत 2022-23 या वर्षात पालिकेच्या मुदत ठेवी 92 हजार कोटींवरून 86 हजार कोटींवर आल्या आहेत. या मुदत ठेवींच्या व्याजातून आस्थापना खर्च आणि निवृत्त अधिकाऱ्यांची देणी चुकवली जातात. बिल्डरांकडून घेतली जाणारी अनामत रक्कमही या ठेवींमध्ये असते. 2023-24 या आर्थिक वर्षातही 15 हजार कोटींची रक्कम विविध विकासकामांसाठी वापरण्यात येईल, असेही सांगण्यात आले असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता,  विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल, दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग आदी विकासकामांच्या खर्चात दुपटीपेक्षा वाढ झाली आहे. पालिकेत निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे या खर्च वाढीवर कोणतीही चर्चा न होता हे प्रस्ताव गोपनीय पद्धतीने मंजूर केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.