प्ले ऑफचा गुंता वाढला; कोणताही संघ बाहेर पडू शकतो

आयपीएलच्या 57 लढती झाल्या आहेत आणि आता केवळ 13 साखळी सामने शिल्लक आहेत. तरीही प्ले ऑफचे चित्र अजूनही अस्पष्टच आहे. आजच्या हैदराबादच्या विजयामुळे आधीच संपलेल्या मुंबईचा पत्ता कट झाला आहे. आता नऊ संघांना प्ले ऑफची संधी असली तरी बंगळुरू, गुजरात आणि पंजाबचे आव्हान संपलेच आहे. फक्त त्यांच्यावर शिक्का बसायचा आहे.

यंदाची आयपीएल अत्यंत चुरशीची होत असल्यामुळे 11 मेपर्यंत प्ले ऑफचे चित्र अस्पष्टच असेल. कोलकाता आणि मुंबई या सामन्यात कोलकाता जिंकला तर ते सर्वप्रथम प्ले ऑफ गाठतील, मात्र हरले तर तो गुंता आणखी वाढेल. उद्या पंजाब आणि बंगळुरू यांच्यातील लढती जो संघ हरेल तो आयपीएलमधून अधिपृतरीत्या आऊट होईल. तसेच जिंकणाऱया संघालाही विजय फारसा चमत्कार करणारा नसेल. त्याचप्रमाणे गुजरात आणि चेन्नई यांच्यात चेन्नई जिंकली तर ते प्ले ऑफचे दावेदार म्हणून कायम राहतील. मात्र हरले तर त्यांचे भवितव्य बंगळुरूविरुद्धच्या सामन्यानंतरच निश्चित होईल.

आजच्या विजयामुळे अव्वल सहाही संघांचे 16 गुण होण्याची शक्यता कायम असल्यामुळे कोणता संघ सर्वप्रथम प्ले ऑफमध्ये उडी मारेल हे 11 मे रोजीच कळेल, पण त्यादिवशीही कोलकाता हरला तर चेन्नई-राजस्थान लढतीत राजस्थानला विजय प्ले ऑफमध्ये पोहोचवेल, मात्र चेन्नई जिंकली तर पुढील लढतींच्या निकालांनंतर नेट रनरेटवरच प्ले ऑफचा फैसला लागेल. त्यामुळे प्ले ऑफचा गुंता 70 व्या लढतीच्या आधी सुटण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. अव्वल सहापैकी कोणतेही चार संघ प्ले ऑफसाठी भिडतील.