4 जूनला जनताच तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल! उद्धव ठाकरे मिंध्यांवर कडाडले

धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मोदी आणि शहांनी आपल्याला दिल्याबद्दल मिंध्यांनी आभार मानल्याची बातमी छापून आली. मिंध्यांच्या कबुलीमुळे निवडणूक आयोगाचं नाटक सर्वांसमोर आलं. मिंधे म्हणतात की मी करेक्ट कार्यक्रम केला. पण 4 जूनला ही जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मावळ येथे केला.

महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. दिल्लीश्वरांच्या तालावर नाचणारी माकडं अशा शब्दांत त्यांनी मिंधे आणि फडणवीसांची पिसं काढली. ते म्हणाले की, आज दिवसभर मी पाहतोय दिल्लीश्वरांची दोन चावीची माकडं, त्यांच्या हातात कोलीत सापडलंय. एका दाढीवाल्या माकडाला माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावच उच्चारता येत नाही. माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो. त्यांचा फुलफॉर्म काय एसंशि. आणि दुसरे देगंफ. ते सध्या भांग प्यायलेल्या माकडांसारखं बोलताहेत. मी त्या माकडांना सांगतोय की बाप बदलण्याची गरज मला नाही, तुम्हाला आहे. तुम्ही दुसऱ्यांचे बाप चोरता कारण तुम्हाला तुमच्या बापांची नावं सांगून कुणीही दारात उभं करणार नाही. सरकार आपल्या दारी करताना लोकं जा आपल्या घरी म्हणतील. या नालायकांना निवडणुकीत मुद्देच राहिलेले नाहीत. जे मुद्दे 2014 आणि 19मध्ये ठरलेले होते, आता त्यांना मुद्देच मिळत नाहीयेत कारण त्यांचं भविष्य आता जनतेने ठरवलेलं आहे. मोदी आता रोडशो करतातहेत. आणलं ना तुम्हाला रस्त्यावर.. चार जूनला आणखी आणणार. जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल. जसं मोदींनी नोटाबंदी केली होती आणि नोटा रद्द होऊन फक्त कागद राहिले होते. तसं मोदी आता पंतप्रधान म्हणून रद्द होतील आणि नुसते नरेंद्र मोदी राहतील. देशात जशी नोटाबंदी झाली होती, तशी आता मोदींची नाणेबंदी होणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी ठणकावलं.

‘आज मी एक व्हिडीओ पाहिला, मला आधी वाटलं एआय आहे की काय. पण नाही ते मोदीच बोलत होते. मोदी अदानी अंबानीवर बोलायला लागले. हा चमत्कारच झाला. मग तुम्हाला जर अदानी अंबानींवर राग असेल तर मोदीजी तुम्ही दिलेली विमानतळं त्यांच्याकडून काढून घेता का? धारावीच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घातली. त्यांना ते रद्द करण्याचे आदेश द्या आणि मग बोला. मिंधे धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी आणि शहांचे आभार मानत असल्याची बातमी छापून आली आहे. एक बरं झालं, निवडणूक आयोगाचं नाटक मिंधेंच्या कबुलीमुळे सर्वांसमोर आलं. हा सर्वोच्च न्यायालयासमोर एक पुरावा झाला आहे की मिंधेंनी स्वतःच्या तोंडाने कबुली दिली आहे. मिंधे म्हणतात की मी करेक्ट कार्यक्रम केला. पण, 4 जूनला ही जनता तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे मिंध्यांवर कडाडले.