ऐतिहासिक आंदोलनानंतर CJP पुन्हा मैदानात; विद्यार्थ्यांसाठी देशभरात ‘जनसंवाद यात्रा’ काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनात यश मिळवले. जगभारातील विविध वृत्तपत्रांनी हे आंदोलन जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. त्यामुळे संपूर्ण जगभरातून आंदोलक विद्यार्थ्यांच्या धैर्याचे कौतुक होत आहे. या यशस्वी आंदोलनानंतर सीजेपी आता देशव्यापी ‘जनसंवाद यात्रा’ काढण्याच्या तयारीत आहे. तरुण पिढीच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा आयोजित केली जाणार असून याद्वारे पक्षाच्या पुढील रणनीतीची आखणी केली जाईल.

कॉक्रोच जनता पार्टीतर्फे यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सीजेपीच्या यशानंतर आता पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार आणि गुरुवारी दोन दिवसीय विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके, प्रवक्ते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून यापुढील पक्षाची भूमिका आणि एकंदरितच रणनीती ठरवली जाणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांत सीजेपीच्या सदस्यांनी जंतरमंतर आंदोलनात सहभागी झालेल्या 50 प्रमुख स्वयंसेवकांसह विविध घटकांशी विस्तृत चर्चा केली आहे. या सल्लामसलतीनंतर पक्षाने देशव्यापी ‘जनसंवाद दौरा’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे तरुणांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास लक्षात घेऊन, देशातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थ्यी एकत्र आले तर कोणतेही मोठे यश मिळवता येते, हे या आंदोलनाने सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी दिली. सीजेपीने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, या रणनीती बैठकीनंतर पक्षाकडून देशव्यापी जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक आणि सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल.