…म्हणून फडणवीसांनी काँग्रेसला मतदान करावे; कोरोना लसीच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा टोला

भाजपने 10 वर्षांच्या सत्ताकाळात कोणतीही विकासकामे केली नसल्याने त्यांच्याकडे प्रचारासाठी मुद्देच नाहीत. भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी विकासावर बोलावे, असे आव्हान विरोधकांनी अनेकदा देऊनही भाजपकडून विकासावर बोलण्यात येत नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला मतदान करण्यासाठी कोरोना लसीचा दाखला दिला. भाजपच्या कार्यकाळात कोरोना लस उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे जनतेने भाजपला मदतान करावे, असे ते म्हणाले. या त्यांच्या विधानावर पलटवार करत जयंत पाटील यांनी फडणवीसांना जबरदस्त टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच करोनावरील लस उपलब्ध झाली आणि देशातील जनतेचे प्राण वाचले, त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना मत देत त्यांना विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. फडणवीस यांच्या विधानाप्रमाणे काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली होती. त्यामुळे फडणवीसांनी आता काँग्रेसला मत द्यावे, असा टोला पाटील यांनी लगावला. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मत द्यावे, असे जयंत पाटील म्हणाले.

गेल्या 10 वर्षात मोदींना काय केले, हे फडणवीसांनी सांगितले पाहिजे. पण दुर्दैवाने त्यांना कोणतेही काम सांगता येत नाही. महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातमध्ये गेले, तेव्हा ते काहीही बोलले नाहीत. अशी शरण गेलेली लोकं राज्याचा विकास करू शकत नाही. महाराष्ट्र हा लढणाऱ्या लोकांचा आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे, असेही पाटील म्हणाले.