छगन भुजबळांचं ऐकून कारवाई झाली तर परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगेंचा इशारा

मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत, मग सरसकट आरक्षण घेणार अशी घोषणा करताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशाराही दिला. जळगावातील जाहीर सभेत जरांगे बोलत होते. एकट्या छगन भुजबळांचं ऐकून आमच्यावर कारवाई झाली तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

सभेला उद्देशून बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न करु नका ही तुम्हाला विनंती आहेत. आमच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत. तरीही आरक्षण दिलं नाहीत तर गाठ आमच्याशी आहे हा तुम्हाला जाहीर इशारा आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

‘मी तुमच्याशी खरं बोलतो आहे. आमदार झाल्यावर काही लोक जात पाहू लागले आहेत. आम्ही जात पाहिली नाही. तरीही काहीजण आपला अपप्रचार केला जातो आहे. आम्हाला सांगण्यात आलं होतं कुणाला अटक होणार नाही आणि गुन्हे मागे घेतले जातील. गिरीश महाजन यांना माझा सवाल आहे की अजून गुन्हे मागे का घेतले नाही? आमचे लोक का अटक केले? शब्द फिरवायचा असेल तर गाठ आमच्याशी आहे’ असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘आम्हाला शांतता ठेवायची आहे. सरकारलाही विनंती करतो आहे की बोलल्याप्रमाणे सगळे गुन्हे मागे घ्या, कार्यकर्त्यांची अटक थांबवा. जे दोषी आहेत त्यांचं समर्थन आम्ही करणार नाही पण निष्पाप लोकांना गुंतवलं जातं आहे ते थांबलं पाहिजे. एकट्या छगन भुजबळांचं ऐकून आमच्यावर कारवाई झाली तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. तुम्ही त्यांच्याच गळ्यात हात टाकून हिंडा. मराठ्याच्या दारातही उभे राहू नका. 24 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्याचं आपलं ठरलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तातडीने लेखी देऊन 24 तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या. त्यांच्या (छगन भुजबळ) सुरात सूर मिसळू नका. तुम्ही त्यांचं ऐकून, दबावाखाली येऊन अन्याय केला तर 55 टक्के मराठे आहेत हे विसरु नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.