तुम्ही माझ्या आईची मणिपुरात हत्या केली आहे! तुम्ही देशद्रोही आहात!! राहुल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल

खासदारकी बहाल झाल्यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाषण केले. सरकारविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दात हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही देशप्रेमी किंवा देशभक्त नसून देशद्रोही आहात असे राहुल गांधी यांनी म्हटले. ते म्हणाले की, माझी एक आई इथे बसली आहे आणि माझ्या दुसऱ्या आईला तुम्ही मणिपुरात ठार मारले आहे. जोपर्यंत तुम्ही हिंसा बंद करत नाही तोपर्यंत माझ्या आईची हत्या होत राहील.

मणिपुरात हिंदुस्थानी सैन्य पाठवा

राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात त्यांनी केलेल्या मणिपूर दौऱ्यातील काही घटनाही सांगितल्या. आपल्या मुलाला डोळ्यादेखत गोळी मारण्यात आली, मी त्याच्या मृतदेहाशेजारी रात्रभर झोपून होते असे एका महिलेने राहुल गांधी यांना सांगितले होते. एक महिला आपली आपबीती सांगताना बेशुद्ध झाली होती. राहुल गांधी म्हणाले की, मणिपूर शिल्लक राहिलेला नाही, त्याचे दोन तुकडे केले आहेत. मी मणिपूरला गेलो मात्र तिथे पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत, कारण त्यांच्यासाठी मणिपूर हा हिंदुस्थान नाहीये असे राहुल यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थानी सैन्य एका दिवसात मणिपुरात शांतता प्रस्थापित करू शकेल. त्यांचा वापर करत नाहीयेत, कारण तुम्हाला हिंदुस्थानला मणिपुरात ठार मारायचे आहे.

रावणाप्रमाणे मोदीही फक्त 2 जणांचेच ऐकतात

मणिपूरसह देशाच्या विविध भागात उसळलेल्या हिंसाचाराबद्दल बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की , तुम्ही संपूर्ण देश पेटवायचा प्रयत्न करत आहात. संपूर्ण देशात भारत मातेची हत्या करत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या यांच्यावर टीका करताना राहुल यांनी मोदींची तुलना रावणाशी केली. रावण हा मेघनाथ आणि कुंभकर्ण या दोघांचेच ऐकायचा तसेच मोदी हे फक्त अमित शहा आणि अदानी यांचेच ऐकतात असे राहुल यांनी म्हटले. अहंकार दूर केल्याशिवाय जनतेचा आवाज आपल्यापर्यंत पोहचत नाही. लंकादहन हे हनुमानाने केले नव्हते तर ते रावणाच्या अहंकाराने जाळले होते. रामाने रावणाला मारले नव्हते तर रावणाला त्याच्या अंहकाराने मारले होते असं म्हणत राहुल यांनी मोदी यांच्यावर टीका केली.