‘देशद्रोही’ काँग्रेस नेत्यांना मारण्यासाठी कायदा हवा; भाजप नेत्याच्या विधानानं वाद

काँग्रेसचे खासदार डीके सुरेश आणि आमदार विनय कुलकर्णी यांना ‘देशद्रोही’ म्हणत अशा लोकांना मारण्यासाठी कायदा करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी केली आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानानं खळबळ उडवून दिली आहे. या दोन्ही नेत्यांच्या संदर्भात ईश्वरप्पा यांनी दावा केला की त्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत.

‘मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की डीके सुरेश आणि विनय कुलकर्णी या देशाचे गद्दार आहेत. ते देशाचे तुकडे करू इच्छितात. जाहीर सभांमधून त्यांनी पुन्हा अशी विधाने करण्याचा प्रयत्न केल्यास, मी एक कायदा करण्याची विनंती करतो की त्यांना गोळ्या घालून ठार मारता येईल असा कायदा करावा’, असं ईश्वरप्पा यांनी सांगितलं. दावणगेरे जिल्ह्यातील कर्नाटक भाजपचे नवे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी समारंभात त्यांनी हे विधान केलं.

त्यांच्या अशी विधानामुळे विविध स्तरातून टीकेची लाट उसळली आहे, अनेकांनी अशा विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.