सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

फक्त गुजरातच्याच कांद्याला निर्यातीची परवानगी देण्याचा निर्णय बॅकफायर होताच आज घाईगडबडीने केंद्र सरकारने 99,150 मॅट्रिक टन कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. हे प्रमाण फार कमी आहे, सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती. सरकारची घोषणा म्हणजे दर्यात खसखस असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टोला लगावला.

आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते म्हणाले की, खरंतर ही बंदी सहा महिन्यांआधीच उठवायला पाहिजे होती पण आधी सरकारने मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार केला, नंतर गुजरातचा विचार केला आणि शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला आहे का अशी शंका येते.

नाशिक, नगर, पुणे या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे 400 पारची घोषणा करणाऱ्यांना 150 तरी मिळतील का अशी भीती वाटत आहे म्हणून हा निर्णय घेतला असावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.