रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी तालुक्यात खळा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मालगुंड येथे झालेल्या खळा बैठकीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कोतवडे जि.प. गटातून खासदार विनायक राऊत यांना मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला.
लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. गावागावात खळा बैठका घेऊन थेट ग्रामस्थांशी संवाद साधला जात आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे खळा बैठक संपन्न झाली. यावेळी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, विधानसभा मतदार संघ क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुका संपर्क प्रमुख मंगेश साळवी, उपतालुका प्रमुख प्रकाश जाधव, विभागप्रमुख उत्तम मोरे, महिला संपर्क संघटक वर्षा पितळे, सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच संतोष चौगुले उपस्थित होते.
यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे यांनी मार्गदर्शन करताना या लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन हॅटट्रीक करा असे आवाहन केले. जिल्हा समन्वयक संजय पुनसकर म्हणाले की, ग्रामीण भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे विणलेले जाळे ही आपली ताकद आहे. घरोघरी जाऊन आपण प्रचार करुया आणि आपण 7 मे ला मशाल चिन्हासमोरील बटण दाबून खासदार विनायक राऊत यांना विजयी करुया. ही निवडणूक खूप महत्वाची आहे. संविधान वाचवायचे असेल तर ही निवडणूक आपल्याला जिंकावी लागेल आणि देशामध्ये इंडिया आघाडीचे सरकार आणावे लागेल.