सामना अग्रलेख – भाजपच्या कोठ्यावर!

ज्यांना खरोखरच तुरुंगात टाकायचे त्यांच्याकडून भाजपने हजारो कोटी रुपयांचे निवडणूक रोखे घेतले किंवा जिंदालसारख्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. देशभरात भाजपचे हेच धोरण आहे. भाजपची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे किंवा पराभवाच्या भयाने त्यांनी देशभरातील गुंड, झुंड व भ्रष्टाचाऱ्यांची मोट बांधून त्या सगळ्यांना निवडणुकीत उतरवायचे ठरवले आहे. पंतप्रधान मोदी यांचे हे एक प्रकारे ‘डिप्रेशन’ आहे. भाजपच्या डिप्रेशनमुळे भारतीय राजकारणाची वाट लागली. महाराष्ट्रापासून हरयाणापर्यंत सर्वत्रच भाजपने राजकारणाचा कोठा केला आहे. या कोठ्यावर नाचत ‘चारशे पार’चा मुजरा व ‘पुन्हा येईन’चा गजरा बांधून ते नाचत आहेत. जनताच हे कोठे बंद केल्याशिवाय राहणार नाही!

भारतीय जनता पक्षाची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होताना दिसत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील त्यांच्या सर्व वल्गना पोकळ ठरल्या आहेत व भाजप हाच भ्रष्टाचारी टोळीचा म्होरक्या असल्याचे आता उघड झाले. राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असल्याचे जगजाहीर आहे. त्याप्रमाणे भाजप हा नामचीन भ्रष्टाचाऱयांचा शेवटचा अड्डा बनला आहे. कोळसा घोटाळय़ात ज्यांच्याविरोधात भाजपने रान उठवले ते नवीन जिंदाल काँग्रेस पक्षातून भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये शिरले व आता त्यांना भाजपने हरयाणातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करून देशाची एक प्रकारे थट्टाच उडवली. एका बाजूला तथाकथित मद्य घोटाळय़ावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक करून तुरुंगात टाकले व त्याच वेळी गाजलेल्या कोळसा घोटाळ्यातील आरोपी नवीन जिंदाल यांना भाजपने उमेदवारी दिली. दिल्ली कोर्टाने नवीन जिंदाल यांना तूर्त जामिनावर सोडले आहे. जिंदाल यांच्यासोबत जे अन्य 13 आरोपी आहेत त्यात मधू कोडा यांचेही नाव आहे. झारखंडमध्ये ‘कोल ब्लॉक’ वाटपात भ्रष्टाचार झाला व जिंदाल हे त्यातले एक प्रमुख लाभार्थी आहेत. ईडीने त्यांच्यावर ‘मनी लाँडरिंग’ कायद्याने गुन्हा दाखल केला होता. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यान्वये हा गुन्हा दाखल झाला होता व जिंदाल यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाने जोरदार मोहीम राबवली होती. जिंदाल यांना अटक करून तुरुंगात डांबावे यासाठी भाजपने जिंदाल यांच्या कार्यालयाबाहेर हल्लाबोल केला, घेराव घातला. त्या वेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यात भाजपचे शंभरावर आंदोलक कार्यकर्ते जखमी झाले होते आणि हजारावर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. जिंदाल यांच्या

कार्यालयावर काळा रंग

फेकण्यात आला होता. पोलीस व भाजप आंदोलकांत झटापट झाली होती. या काळात जिंदाल यांच्या निवासस्थानी छापेमारी झाली. तेच जिंदाल आता भाजपमध्ये येऊन एकदम ‘स्वच्छ’ झाले; पण जिंदाल यांच्या विरोधात लाठ्याकाठ्या खाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या भावनांचा कोणी विचार केला आहे काय? भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान), 409 व 420 आणि भ्रष्टाचारविरोधी कलम 13 (1) (सी) व 13 (1) (डी) नुसार नवीन जिंदाल यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. म्हणजे अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी आरोप जिंदाल यांच्यावर आहेत व भाजपने त्यांना तुरुंगात पाठवण्याचे ठरवलेच होते. मात्र जिंदाल आता भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील कोळशाचे डाग धुऊन निघाले व ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले, त्या सगळ्यांना आता जिंदाल यांच्या सतरंज्या उचलाव्या लागतील. भारतीय जनता पक्षाचे सध्याचे हेच चरित्र बनले आहे. देशातील भ्रष्टाचाराचे ‘कोठे’ बंद करण्याचे वायदे करून हे लोक सत्तेवर आले, पण कोठय़ावरील पैशांचा खणखणाट पाहून हेच लोक कोठय़ावर बसले व गिऱ्हाईकांचे मन रिझवू लागले. भाजप हा अशा प्रकारे कोठ्यावरचा पक्ष बनला आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून अनेक ठेकेदार, गुन्हेगार, भ्रष्ट लोकांनी भाजपच्या कोठ्यावर दौलतजादा केली. त्यात श्रीमान जिंदाल यांचा समावेश आहे का? याचा शोध घ्यावाच लागेल. ज्या मद्य घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना अटक केली त्या प्रकरणातला मुख्य आरोपी अरबिंदो फार्माचा संचालक सरथ रेड्डी हा आहे. त्याला अटक करताच त्याने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला 35 कोटी रुपये दिले आणि सरकारी

माफीचा साक्षीदार

बनला व केजरीवालविरोधात साक्ष दिली. एकीकडे कोळसा घोटाळ्यातील जिंदाल यांना भाजपमध्ये प्रवेश दिला, त्याच वेळी कर्नाटकात जनार्दन रेड्डी यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकले व भाजपमध्ये प्रवेश दिला. रेड्डी बेकायदेशीर खाण उद्योगाचे बादशहा मानले जातात व सीबीआयने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवले होते. जामीन मिळावा म्हणून हायकोर्टाच्या न्यायाधीशांना 40 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न या जनार्दन रेड्डी यांनी केला, तो कोर्टानेच उघड केला. जनार्दन रेड्डी व त्यांच्या कुटुंबाने बेकायदा खाण व्यवसायातून प्रचंड पैसा कमावला. ते तुरुंगात गेले व आता गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये सामील झाले. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन रेड्डींचा व्यवसाय पुन्हा बहरून येईल. त्या व्यवसायाचा लाभ भाजपला होईल. लवकरच जनार्दन रेड्डी यांच्यावरील सर्व खटले संपून जातील. भारतीय जनता पक्षाचे हे असे चालले आहे. ज्यांना खरोखरच तुरुंगात टाकायचे त्यांच्याकडून भाजपने हजारो कोटी रुपयांचे निवडणूक रोखे घेतले किंवा जिंदालसारख्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. म्हणजे जिंदाल यांच्या विरुद्धचे आरोप आणि आंदोलन बनावट होते व भाजपने फक्त बदनामीचा धुरळा उडवला. देशभरात भाजपचे हेच धोरण आहे. भाजपची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे किंवा पराभवाच्या भयाने त्यांनी देशभरातील गुंड, झुंड व भ्रष्टाचाऱयांची मोट बांधून त्या सगळ्यांना निवडणुकीत उतरवायचे ठरवले आहे. पंतप्रधान मोदी यांचे हे एक प्रकारे ‘डिप्रेशन’ आहे. भाजपच्या डिप्रेशनमुळे भारतीय राजकारणाची वाट लागली. महाराष्ट्रापासून हरयाणापर्यंत सर्वत्रच भाजपने राजकारणाचा कोठा केला आहे. या कोठय़ावर नाचत ‘चारशे पार’चा मुजरा व ‘पुन्हा येईन’चा गजरा बांधून ते नाचत आहेत. जनताच हे कोठे बंद केल्याशिवाय राहणार नाही!