राहुरीतील ‘त्या’ युवकाचा मृत्यू पोलीस मारहाणीतच,  बहिणीने केला आरोप

आरडगाव (ता. राहुरी) येथील युवकाचा मृत्यू राहुरी पोलिसांच्या मारहाणीतूनच झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल तसेच व्हिसेराचा अहवाल अद्यापही मिळालेला नाही, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. माझ्या भावाचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचा बाँड पेपरवर लिहून देण्यास असल्याचे मृत विनोद जगधने याची बहिण रेणुका जगधने यांनी सांगितले.

राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील मृत युवकाचे नाव विनोद अशोक जगधने आहे. त्याचा मृत्यू 7 जानेवारी 2024 रोजी झाला होता. राहुरी पोलीस ठाण्यातील बाबासाहेब शेळके,महिला पोलिस कर्मचारी व अन्य एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मारहाणीमुळे विनोद याचा मृत्यू झाल्याचा बहीण रेणुका हिचा आरोप आहे. मोबाइल चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी विनोद याला 5 जानेवारी 2024 या दिवशी ठाण्यात बोलावले होते. तेथे त्यांनी बेड्या ठोकत छातीत व पोटावर लाथाबुक्क्यांनी विनोद याला मारहाण केली. त्यामुळे त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. पोलिसांनी त्याला घरी सोडल्यानंतर त्याच्या उलट्या सुरू होत्या. त्यातून रात्री विनोद याचा मृत्यू झाल्याचे रेणुका जगधने हिचे म्हणणे आहे.तिने जिल्हा पोलिस प्रमुखांकडे यासंबंधी तक्रार केली आहे.

पोलीस ठाण्यामध्ये जखमी अवस्थेतील विनोद याला ताब्यात देण्यासाठी पोलिस हवालदार शेळके यांनी मला फोन केला. मात्र एका फायनान्स कंपनीत नोकरीस असल्याने विनोद याला घरी सोडण्याची विनंती मी केली. शेळके यांनी वारंवार फोन करुन ताब्यात घेण्यास सांगितले. मात्र विनोद याला ताब्यात घेण्यास मी नकार दिला.अखेर 5 जानेवारीला संध्याकाळी पोलिसांनी विनोद याला घरी सोडले. त्याची तब्येत खालावली. 7 जानेवारीला रात्री त्याला रक्ताची उलटी झाली. रात्री त्याचा मृत्यू झाला. राहुरी येथील सरकारी रुग्णालयात त्याला नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.वारंवार संपर्क साधूनही पोलिस पंचनामा व शवविच्छेदनासाठी आले नाहीत.अखेर एका नेत्याकडे कैफियत मांडली.त्यानंतर पोलीस दाखल झाले.

शवविच्छेदन व व्हिसेरा अहवाल देण्यास टाळाटाळ

पोलिसांकडे शवविच्छेदन अहवाल तसेच व्हिसेरा अहवालाची वारंवार मागणी केली. मात्र अद्यापहीं अहवाल देण्यात आला नाही.व्हिसेरा अहवालासाठी दोन ते चार वर्षे लागू शकतात असे पोलिसांनी कळविले आहे.शवविच्छेदन व व्हिसेरा अहवाल देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे रेणुका जंगधने यांचे म्हणणे आहे.पोलिस ठाण्यात दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध आपली फिर्याद देण्यासाठी गेले असता फिर्याद घेण्यात आली नाही.असे रेणुका जगधने हिने सांगितले.

पोलिसांकडे त्या संदर्भात माहिती नाही

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी संपर्क साधला.त्यावेळी नशा केल्याने विनोद याचा मृत्यू झाला असावा असे त्यांनी सांगितले. त्याचा व्हिसेरा अहवालाबाबत माहिती घेऊन कळवितो,असे ठेंगे म्हणाले.मात्र त्याबाबत त्यांनी नंतर अहवाल प्राप्त झालेला नाही.सीसीटिव्ही फुटेज चेक केले आहे.त्यात मारहाणीचे फुटेज सापडले नाहीत.पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी आरोप फेटाळला आहे.अधिक कोणतीही माहिती माझ्याकडे नाही.व्हिसेरा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.असे ठेंगे यांनी सांगितले.

पोलिसांची जखमी फिर्यादीस मारहाण

राहुरी पोलीस ठाण्यात मार्च महिन्यात शेतीच्या वादातून भावकीत वाद होवून एका भावकीने दुसऱ्या भावकीतील तरुणास मारहाण करुन चावा घेतला.वैद्यकीय अहवालानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.दुसऱ्या दिवशी दोन्ही भावकीच्या कुटुंबातील मारहाण करणाऱ्यांना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या समोर हजर केले.समोरच्या व्यक्तीने मोठी आर्थिक तडजोड केल्याने ज्या फिर्यादीच्या हाताला चावा घेतला त्या जखमी फीर्यादीला पोलिसांनी ‘झुठ बोले कव्वा काटे’ या पट्ट्याखाली मारहाण केली.फिर्यादीलाच मारहाण होणार असेल तर न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न यावेळी फिर्यादीने बोलावून दाखविले.