सीबीएसईच्या अभ्यासक्रमात होणार बदल, दहावी-बारावीला अतिरिक्त भाषा विषय

प्रातिनिधिक फोटो

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी-बारावीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल होणार आहेत. बोर्डाच्या नव्या प्रस्तावानुसार दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त भाषा विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 10 विषयांचे पेपर द्यावे लागणार आहेत, तर बारावीमध्ये विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 6 विषयांत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. शालेय शिक्षणात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लागू करणे हा या बदलाचा उद्देश असून या प्रस्तावाबाबत शाळाप्रमुख आणि शिक्षकांकडून अभिप्राय घेतला होता. शिक्षकांकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

बारावीला एका भाषेऐवजी दोन भाषा

बारावीसाठी प्रस्तावित केलेल्या बदलांमध्ये विद्यार्थ्यांना आता 1 ऐवजी 2 भाषांचा अभ्यास करावा लागेल. यामध्ये किमान 1 भाषा ही मूळ हिंदुस्थानी भाषा असावी. तसेच विद्यार्थ्यांना बारावी मध्ये 5 ऐवजी 6 विषयांत परीक्षा द्यावी लागेल. 6 विषयांमध्ये 2 भाषा आणि 4 इतर विषय असतील. आणखी एक बदल म्हणजे आता एका शैक्षणिक वर्षात अंदाजे 1200 तास अध्यापन करावे लागणार आहे, यामुळे 40 क्रेडिट्स मिळविण्यात मदत होईल. प्रत्येक विषयासाठी तासांची निश्चित संख्या दिली जाईल आणि चांगले निकाल मिळविण्यासाठी सरासरी विद्यार्थ्याला वर्षभरात 1200 तास शाळेत घालवावे लागतील. मात्र ही नवीन प्रणाली कोणत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दहावीला तीन भाषांचा अभ्यास

दहावीच्या विद्यार्थ्यांना 2 ऐवजी 3 भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यात किमान 2 स्थानिक भाषा असाव्यात. याशिवाय दहावीमध्ये सात विषय जोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यात गणित आणि कम्प्युटेशन थिंकिंग, सामाजिक विज्ञान, विज्ञान, कला शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण यांचा समावेश आहे. 3 भाषा, गणित आणि संगणकीय विचारसरणी, सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि पर्यावरण या विषयांचे बाह्य मूल्यमापन केले जाईल. इतर 3 विषयांचे मूल्यांकन अंतर्गत आणि बाह्य दोन्ही पद्धतीने केले जाईल. या सर्व दहा विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सर्व 10 विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी विषयांत उत्तीर्ण उमेदवारांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाही.