मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर देशात दंगली भडकतील! वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

 ‘नरेंद्र मोदी हे पंतप्रधान देशासाठी लाभदायक नाहीत. ते मुख्यमंत्री होते तेव्हा गोध्रा हत्याकांड घडले. पंतप्रधान झाले तेव्हा मणिपूर जळले. आता पुन्हा पंतप्रधान झाल्यास राज्यघटना बदलल्याशिवाय राहणार नाही. हा संभाव्य धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर देशात दंगली भडकतील,’ असा इशारा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

मुस्लिम समाजाच्या वतीने फतेह चौकात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता मोदींच्या कार्यकाळात देशावरील कर्ज कितीतरी पटीने वाढले आहे. मोदी सरकार हे शेतकरीविरोधी सरकार आहे. देशभरातील शेतकरी आजही दिल्लीत आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमाल त्यांच्या शेतातच खरेदी करावा, असे मोदी सरकारचे धोरण आहे. याला विरोध म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, मात्र मोदींच्या हुकूमशाहीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही सांगता येत नाही.  एनआरसी, सीएए हा कायदा  अन्यायकारक आहे. देशात जन्मलेल्या लोकांना जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागेल. देशात अशी काही जमात आहे की, त्यांचा राहण्याचा ठावठिकाणा नसतो, दोन वेळचे जेवण मिळाले तरी त्यांच्यासाठी खूप आहे अशा लोकांकडे जन्माचा दाखला नसेल तर त्यांना आतंकवादी म्हणणार काय, असा सवालही आंबेडकर यांनी केला.

लोक मोदींना कंटाळले आहेत!

सर्व प्रकारच्या कायद्याचा विरोध करण्यासाठी संसदेत आवाज उठवणे गरजेचे आहे. मोदी सरकारला लोक पंटाळले आहेत. प्रत्येकाला परिवर्तन हवे आहे. कोणी उघडपणे बोलतात तर कोणी बोलत नाहीत. देशभरातील जनता हे मोदीच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे,’ असेही ते म्हणाले.