आयपीएलचा किंग कोण? कोलकाता की हैदराबाद? आज रंगणार फायनलचा थरार

देशात सध्या कोणता संघ आयपीएलच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरणार आणि लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यापैकी आयपीएलच्या विजेतेपदाचा फैसला रविवारी होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद सनरायझर्स या संघांमध्ये चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल-17ची फायनल रंगणार आहे.

पहिल्या क्वालिफायरमध्ये झुंजलेले कोलकाता आणि हैदराबाद हे दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यापैकी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघ तिसऱ्यांदा, तर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ दुसऱ्यांदा आयपीएलचा चषक उंचावण्यास उत्सुक आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने यंदा बाजी कोण मारणार, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

यंदाच्या सीझनमध्ये कोलकाता आणि हैदराबाद संघ आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले. यात दोन्ही वेळा केकेआरने बाजी मारली आहे. 21 मे रोजी झालेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये कोलकात्याने हैदराबादचा 8 विकेट आणि 38 चेंडू राखून धुव्वा उडवला होता. त्यापूर्वी 23 मार्च रोजी झालेल्या चुरशीच्या साखळी सामन्यात कोलकाता संघाने 4 धावांनी सरशी साधली होती. हे पाहाता अंतिम लढतीत कोलकात्याचे पारडे जड जाणवते. मात्र, टी-20 प्रकारात अशा प्रकारचा अंदाज काढणे धोक्याचे ठरू शकते. कारण, अवघ्या एक-दोन षटकांत सामना फिरल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचबरोबर, हैदराबादचा संघ फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही आघाडीवर कमालीचा धोकादायक आहे. त्यामुळे विजेतेपद पटकावण्याबरोबरच क्वालिफायरसह यंदाच्या आयपीएलमधील दोन पराभवांची सव्याज परतफेड करण्याच्या इराद्याने हैदराबादचा संघ कोलकात्याविरुद्ध दोन हात करेल. दुसरीकडे, हैदराबादविरुद्ध विजयी सातत्य कायम ठेवत अंतिम सामना जिंकण्याच्या इर्षेने कोलकाता संघ मैदानात पाय ठेवेल.

हेड टू हेडमध्ये कोलकाता सरस

दोन्ही संघांचं हेड टू हेड रेकॉर्ड पाहिलं तर कोलकात्याचा संघ हैदराबादवर भारी पडला आहे. केकेआर आणि हैदराबाद यांच्यामध्ये आतापर्यंत 27 वेळा लढत झाली आहे. 18 सामन्यांत केकेआरने बाजी मारली आहे. यात यंदाच्या आयपीएलमधील दोन विजयांचाही समावेश आहे. हैदराबादनं आतापर्यंत फक्त ९ सामन्यांत कोलकात्यावर विजय मिळवला आहे. हैदराबादचा विचार करता सलामीवीर ट्रॅव्हिस हेड सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने १४ सामन्यांत एक शतक आणि 4 अर्धशतकांसह 192.20च्या भन्नाट स्ट्राईक रेटने 567 धावा फटकावल्या आहेत. त्याचा सलामीचा सहकारी अभिषेक शर्मा हादेखील भन्नाट फॉर्मात आहे. अभिषेकने 15 सामन्यांत धावांचा पाऊस पाडला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज टी. नटराजननं 13 सामन्यांत हैदराबादसाठी सर्वाधिक 19 बळी घेतले आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो चौथ्या स्थानी आहे. केकेआर विरुद्ध हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या 228 राहिली आहे. तर, हैदराबादविरुद्ध केकेआरची सर्वोच्च धावसंख्या 208 आहे. केकेआरकडून अष्टपैलू सुनील नरेन फलंदाजीत सरप्राईज पॅकेज ठरला आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांसह कोलकात्यासाठी सर्वाधिक 482 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 179.85 असा प्रभावी आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनं 14 सामन्यांत केकेआरसाठी सर्वाधिक 20 बळी घेतले आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या स्थानी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

टी-20 विश्वचषकात निवड झालेला एकही खेळाडू फायनलमध्ये नाही

सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सचे आव्हान संपवून आयपीएलच्या फायनलमध्ये धडक दिली. विजेतेपदासाठी या संघासमोर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान असेल. याचदरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये जून महिन्याच्या प्रारंभापासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी हिंदुस्थानी संघातील अनेक खेळाडू रवाना झाले आहेत. पूर्वी बीसीसीआयनं निश्चित केलं होतं की, टी-20 विश्वचषकासाठी हिंदुस्थानी संघात ज्या खेळाडूंची निवड झाली आहे, ते दोन टप्प्यांत अमेरिकेला रवाना होतील. बीसीसीआयच्या नियोजनानुसार ज्या हिंदुस्थानी खेळाडूंचा संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचणार नाही, ते 25 मे रोजी विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. त्याचबरोबर ज्या खेळाडूंचा संघ फायनलला पोहोचेल ते फायनल झाल्यानंतर 27 मे रोजी अमेरिकेला प्रयाण करतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू किंवा राजस्थान रॉयल्स यांच्यापैकी किमान एक संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला असता, तर हे नियोजन उपयोगी पडले असते. मात्र, प्रत्यक्षात आयपीएल फायनलमध्ये कोलकाता आणि हैदराबाद हे असे संघ पोहोचले आहेत. ज्या संघातील एकाही हिंदुस्थानी खेळाडूचे नाव टी-20 विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या हिंदुस्थानी संघात नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)